
मैदान वाचवण्यासाठी माजी नगरसेवक एकवटले
दिनांक १४ मे २०२६ रोजी होणाऱ्या महासभेत सागर पार्कवर क्रिकेट सामन्यांना मनाई करण्याचा ठराव पारित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी निवेदनाद्वारे प्रशासनावर तोफ डागली आहे. “जळगाव शहरात खेळाडूंसाठी हक्काचे एकच मैदान शिल्लक आहे. काही विशिष्ट लोकप्रतिनिधींना खुश करण्यासाठी खेळाडूंच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. रहिवाशांच्या तक्रारींचे केवळ निमित्त असून, भविष्यात या जागेवर व्यावसायिक संकुले उभारण्याचा डाव असू शकतो,” असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
नियम पाळू, पण खेळ थांबवू नका!
गेल्या १०-१२ वर्षांपासून या मैदानावर विविध समाज आणि धर्मांच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमुळे शहरात सामाजिक सलोखा आणि एकोपा वाढीस लागतो. आंदोलकांनी प्रशासनाला काही पर्यायही सुचवले आहेत:
- वेळेची मर्यादा: रात्री १० ऐवजी ९ वाजेपर्यंतच स्पर्धा खेळवण्यात याव्यात.
- ध्वनी प्रदूषण: ध्वनीक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवून नियमांचे पालन केले जाईल.
- स्वच्छता: मैदानावर कचरा होणार नाही आणि दररोज साफसफाई होईल, याची जबाबदारी आयोजकांवर सोपवावी.
महासभेत ठराव रद्द करण्याची मागणी
”पूर्वीप्रमाणेच अटी व शर्ती लागू करून क्रिकेट स्पर्धांना परवानगी कायम ठेवावी. जर खेळाडूंच्या हक्कावर गदा आली, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा सुनील माळी, किरण राजपूत, रिंकू चौधरी, सुहास चौधरी आणि नईम खाटीक यांनी दिला आहे.
आता १४ मे रोजी होणाऱ्या महासभेत सत्ताधारी आणि प्रशासन खेळाडूंच्या बाजूने उभे राहते की बंदीचा ठराव मंजूर करून क्रीडाप्रेमींचा रोष ओढवून घेते, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिकेच्या मालकीच्या ऐतिहासिक सागर पार्क मैदानावर क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आगामी महासभेत येणार असल्याच्या चर्चेने क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा निर्णय खेळाडूंवर अन्याय करणारा असून, राजकीय स्वार्थापोटी मैदान हडपण्याचे हे कारस्थान असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी आणि राजुभाऊ मोरे यांच्यासह क्रीडा कार्यकर्त्यांनी केला आहे.







