
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव येथे शासकीय कार्यालयाचा उघडपणे गैरवापर करत प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांचा वाढदिवस दालनातच केक कापून साजरा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनातील शिस्त आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधितांवर तात्काळ शिस्तभंग कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
**कार्यालयातच वाढदिवसाचा जल्लोष**
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी शासकीय कामकाजाच्या वेळेतच प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी त्यांच्या दालनात सहकाऱ्यांसह वाढदिवस साजरा केला. केक कापणे, फोटोसेशन आणि जल्लोष यामुळे कार्यालयीन वातावरण ‘उत्सवमय’ बनले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
**नियमांची पायमल्ली स्पष्ट आदेशांचा भंग**
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार शासकीय कार्यालयात कोणतेही वैयक्तिक किंवा अशासकीय समारंभ घेण्यास सक्त मनाई आहे. तसेच महसूल व वन विभागाच्या २३ जून २०२५ च्या परिपत्रकानुसार अशा प्रकारच्या समारंभांवर स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील संबंधित अधिकाऱ्यांनी नियमांना जुमानले नाही, ही बाब गंभीर मानली जात आहे.
कोण होते उपस्थित?
या वाढदिवस सोहळ्यात
जिल्हा व्यवस्थापक (विपणन व ज्ञान) हरेश्वर भोई
वाहनचालक नरेंद्र निकम
शिपाई मुन्ना खाटीक
आणि इतर कर्मचारी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. **भ्रष्टाचाराच्या आरोपांची पार्श्वभूमी**
तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी आरोप केला आहे की, राजू लोखंडे व हरेश्वर भोई यांच्यावर यापूर्वीही उमेद अभियानातील भ्रष्टाचार व पदाचा गैरवापर यासंदर्भात अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. मात्र, प्रशासनाकडून त्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
**तक्रारदारांचा इशारा**
“शासकीय कार्यालय हे जनतेच्या कामासाठी आहे, वैयक्तिक सोहळ्यांसाठी नाही. नियमांची सरळसरळ पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असा इशारा तक्रारदार दिनेश भोळे यांनी दिला आहे.
कारवाई होणार का?
सदर प्रकरणाची तक्रार राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठवण्यात आली असून आता प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर यावर कारवाई झाली नाही, तर “नियम फक्त कागदावरच” अशी भावना अधिक बळावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शासकीय दालनात वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर खरोखर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा प्रकरण दडपलं जाणार?







