
जळगांव प्रतिनिधी ।
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याची गंभीर बाब समोर येत असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गावोगावी खुलेआम सुरू असलेली गावठी दारू विक्री, पन्नी दारू, मटका, जुगार, अवैध वाळू वाहतूक, गुटखा विक्री यांसारखे धंदे दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलीस हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात संबंधित अधिकारी अपयशी ठरत असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ स्तरावरून याबाबत गंभीर दखल घेतली जात असून, संबंधित पोलीस ठाण्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक भागात अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असून काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीर हालचाली सुरू असतात. मात्र, याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अवैध धंद्यांमुळे युवक वर्ग व्यसनाच्या आहारी जात असून सामाजिक वातावरण बिघडत चालल्याची चिंता पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे. गावागावात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नसल्याचे संकेत दिले असून, संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात धडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“अवैध धंद्यांवर लगाम कधी?” – नागरिकांचा थेट सवाल
जिल्ह्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, आता प्रशासनाने केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष कारवाई करून परिणाम दाखवावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.






