
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत एका ३५ वर्षीय अविवाहित तरुणाची तब्बल २ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार यावल तालुक्यात उघडकीस आला आहे. विवाहित महिलेलाच नववधू म्हणून उभे करून, बनावट नातेवाईक तयार करत दलालांनी विवाह लावून दिला आणि लग्नानंतर पसार होण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र तरुणाच्या सतर्कतेमुळे हे संपूर्ण रॅकेट उघड झाले असून यावल पोलिसांनी सातही संशयितांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.
कसा झाला फसवणुकीचा पर्दाफाश?
मालोद (ता. यावल) दिनेश शालिक पाटील (वय ३५) हा अविवाहित तरुण नोकरी नसल्याने विवाह जुळत नसल्याचा फायदा घेत दलालांनी “लग्न करून देतो” असे आमिष दाखवले.
वधू, दागिने व इतर खर्चासाठी दलालांनी २ लाख ५४ हजार रुपये उकळले. त्यानंतर १२ जानेवारी रोजी मालोद येथे विवाह सोहळा पार पडला.
मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दिव्या लक्ष्मण पवार (खरे नाव कृतिका ऋतिक जावरे, रा. बादशर, ता. भडगाव) हिने “माझ्या मावसभाऊचा अपघात झाला आहे” असे सांगून गावी जाण्याचा हट्ट धरला.
मावसभाऊचे नाव, गाव, काम, अपघाताचा तपशील विचारताच तिची उत्तरे विस्कळीत झाली आणि संशय बळावला.
थेट पोलीस ठाण्यातबनावट लग्नाचा भांडाफोड
संशय आल्यानंतर दिनेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी १३ जानेवारी रोजी नववधूस थेट यावल पोलीस ठाण्यात आणले.
सखोल चौकशीत हे लग्नफसवणूक रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले. पैसे घेऊन विवाह लावायचा आणि नंतर वधू पसार होण्याची पद्धत या टोळीने अवलंबल्याचे उघड झाले.
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल; टप्प्याटप्प्याने अटक
दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व सहायक फौजदार वसंत बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आरोपींना अटक करण्यात आली.पुनम सुरेश भिल्ल (रा. अडावद, ता. चोपडा)
दिव्या लक्ष्मण पवार (खरे नाव कृतिका ऋतिक जावरे)
मनोहर युवराज अहिरे (रा. अमरदे, ता. शिंदखेडा, जि. धुळे)
बाळा उर्फ यशोदीप किरण पाटील (रा. अजंदे, ता. शिरपूर, जि. धुळे) बनावट आई, बनावट आत्या व बनावट आजी काही आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर महिलांनी तपासात सहकार्य व मुद्देमाल जमा केल्याने त्यांना नोटीसवर सोडण्यात आले आहे.
१.७० लाखांची रोकड, दागिने जप्त या प्रकरणात पोलिसांनी—
१ लाख ७० हजार रुपये रोकड
चांदीचे दागिने, साड्या, बेंटेक्स मंगळसूत्र अंदाजे ४,२६१ रुपयांचा ऐवज असा मुद्देमाल जप्त केला आहे.
दलालांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
ग्रामीण भागात “पैसे दिल्यास लग्न करून देतो” असे आमिष दाखवणाऱ्या दलालांपासून नागरिकांनी सावध राहावे, अशा टोळ्या लग्नानंतर वधूला पळवून नेऊन आर्थिक फसवणूक करतात, असे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी स्पष्ट केले आहे.







