
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल (अनुसूचित जमाती) समाजाला शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ मिळावा, यासाठी भिमशक्ती सामाजिक संघटना, जळगाव यांच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये भारतीय राज्यघटनेतील कलम ४६ चा उल्लेख करून अनुसूचित जाती-जमाती व दुर्बल घटकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय उन्नतीसाठी शासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संघटनेने चिखली खुर्द येथील आदिवासी बांधवांसाठी पुनर्वसन, शबरी योजनेचा लाभ, ट्रॅक्टर योजना, घरकुल योजना, तसेच अतिक्रमण नियमाकुल (कायम) करणे यासारख्या महत्त्वाच्या मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या आहेत.
हे निवेदन भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील किशन जवरे यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले असून संबंधित प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनामुळे चिखली खुर्द परिसरातील आदिवासी समाजाच्या विकासाच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटली असून आता प्रशासन यावर कोणती ठोस पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आज दिनांक ०५/०५/२०२६ रोजी भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मा. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जवरे, जिल्हा उपाध्यक्ष सागर कुरेशी, भुसावळ शहर प्रमुख विनोद पवार, यावल तालुका अध्यक्ष संजय तायडे, यावल तालुका उपाध्यक्ष गोत्तम सुरवाडे, देविदास बागुल (ता. सचिव, यावल), सुनील भिल, प्रकाश भिल तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.







