
महाठग अशोक खरातसह अन्य भोंदूबाबा अन् गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी
सारिपाट / प्रशांत बाफना
नाशिकसह नगर जिल्ह्यातील अनेकांना ठगविणार्या आणि महिलांचे लैंगिक शोषण करणार्या अशोक खरात याच्याबद्दल पहिली तक्रार नगर पोलिसांकडे आली. ही तक्रार प्राप्त होताच हे अत्यंत नाजूक आणि तितकेच गंभिर प्रकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेले. अशोक खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यापासून ते त्या गुन्ह्याची गोपनियता ठेवत आणखी पुरावे हाती आणण्यात पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भूमिका निर्णायक राहिली. खरात प्रकरणात संयमाने सार्या गोष्टी करताना गोपनियता राहिल यासाठी अत्यंत विश्वासू सहकारी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात देखील घार्गे यांची भूमिका महत्वाची ठरली.
खरात प्रकरणात थेट राज्याच्या महिला आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आणण्यात देखील नगर पोलिसांचा पर्यायाने टीम लिडर म्हणून सोमनाथ घार्गे यांचा मोलाचा वाटा राहिला. रुपाली चाकणकर यांच्याकडून नगर पोलिसांवर दबाव आणला असतानाही खरात प्रकरणाचा तपास सुरू ठेवत त्यावर पाळत ठेवली. खरात काय करतो, कुठे जातो, त्याला कोण भेटते इथपासून ते तो पळून जाणार नाही यासाठी काळजी नगर पोलिसांनी घेतली.
भोंदूगिरीतून अनेक महिलांचे शोषण करत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणार्या अशोक खरात याचे कारनामे उघडकीस आणल्याबद्दल सोमनाथ घार्गे व अन्य अधिकार्यांना गृह विभागाचे बक्षीस मिळेल असे वाटत असतानाच त्यांच्या बदलीचे आदेश आले. पालकमंत्र्यांपासून ते सत्ताधारी पक्षाच्या आमदार- खासदारासह विरोधी आमदारांशी घार्गे यांचे चांगले संबंध राहिले. कोणाचीही त्यांच्याबद्दल तक्रार जाहीरपणे समोर आली नाही. तरीही त्यांची मुदतपूर्व म्हणजेच वर्षाचा कालावधी देखील पूर्ण झालेला नसताना बदली झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.
नगरला बदलून येण्याआधी सोमनाथ घार्गे हे रायगड मध्ये पोलिस अधीक्षक होते. त्यावेळी तेथे बनावट कॉल सेंटरचे मोठे प्रकरण उघडकीस आले. त्या कॉल सेंटरला बाळासाहे पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा छुपा वरदहस्त राहिल्याची चर्चा झडली. त्यावेळी रायगडसह कोकणातील माध्यमांमध्ये याबद्दल बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर घार्गे यांची नगरला बदली झाली आणि बाळासाहेब पाटील यांची नाशिकला बदली झाली. दोघांनीही पदभार घेतला. त्यानंतर रायगडमधून गाशा गुंडाळलेले कथीत कॉल सेंटर नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू झाले. अवघ्या काही दिवसच हे कॉल सेंटर चालले. या कॉल सेंटरवर मुंबईतील गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली आणि त्याचा पर्दाफाश झाला. त्या कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल आणि गंडवागंडवी झाली.
पाटील आणि घार्गे हे दोन्ही अधिकारी त्या प्रकरणात चर्चेत आले. पाटलांची नाशिकमधून बदली झाली. घार्गे यांना रश्मी शुक्ला यांचा वरदहस्त मिळाला आणि त्यांची बदली टळली. मात्र, या कॉल सेंटरची एसआयटी चौकशी चालूच राहिली. त्या चौकशीचा अहवाल आता कोणत्याही क्षणी सादर होईल. हा अहवाल गृह विभागाला म्हणजेच गृह खाते सांभाळणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर होण्याच्या आधीच सोमनाथ घार्गे यांची बदली झालीय. यातच बरेच काही आले आहे.
नव्याने दाखल झालेले आणि आजच पदभार घेतलेले जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे थेट आयपीएस आहेत. नगरमध्ये दाखल होताच त्यांनी राहुरीला भेट दिली. राहुरी पोटनिवडणुकीच्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या गोडावूनला भेट देत त्यांनी अधिकार्यांना सुचना केल्या. थेट आयपीएस असल्याने त्यांची काम करण्याची पद्धत वेगळीच असणार! जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहेच. मात्र, त्याहीपेक्षा व्हाईट कॉलर गुंड खड्यासारखे बाजूला करणे आणि त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. याशिवाय खाकी वर्दीतील अधिकार्यांपेक्षा काही बदमाश कर्मचार्यांपासून त्यांना सावध राहावे लागणार आहे.







