
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषपूर्ण वातावरणात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. संपूर्ण गावात सकाळपासूनच जयंतीचा उत्साह दिसून येत होता.
जयंतीनिमित्त साकळी गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, निळ्या झेंड्यांच्या लहरीत आणि “जय भीम” च्या घोषणांनी संपूर्ण साकळी दणाणून गेले.
या उत्सवात सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, युवक, महिला तसेच साकळी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेकांनी बाबासाहेबांच्या विचारांवर भाषणे करत त्यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या संदेशाचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. ज्यामुळे जयंतीला सामाजिक सेवेची जोड मिळाली.
संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, एकोपा आणि समाजबंध दृढ करण्याचा संदेश दिसून आला. साकळी गावात साजऱ्या झालेल्या या जयंतीने बाबासाहेबांच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा समाजात दृढ केला असून, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश प्रत्येकाच्या मनात रुजवला.
साकळीतील ही जयंती केवळ उत्सव न राहता सामाजिक जागृतीचा आणि एकतेचा प्रेरणादायी सोहळा ठरला.






