
उपसंपादक: मन्सूर तडवी
कठोरा (ता. चोपडा, जि. जळगाव)
ग्रामपंचायत कठोरा येथे शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी, निराधार, बेघर आणि भूमिहीन नागरिकांना जागा वाटप करण्यास जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचा गंभीर आरोप भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे करण्यात आला आहे. या अन्यायाविरोधात तात्काळ कार्यवाही न झाल्यास, चोपडा पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात तालुकाध्यक्ष मुबारक नजबुल तडवी आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, माहिती अधिकार कार्यकर्ता तसेच पत्रकार राहुल जयकर यांच्या स्वाक्षरीचे निवेदन ग्रामपंचायत कठोरा, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनात शासनाच्या मालकीची जमीन पात्र लाभार्थ्यांना त्वरित वाटप करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद जळगाव यांनी यापूर्वीच घरकुलासाठी जमीन वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील ग्रामपंचायतीकडून या आदेशांकडे दुर्लक्ष केले जात असून, हा शासनविरोधी व भूमिहीन जनतेच्या हक्कावर गदा आणणारा प्रकार असल्याचे भीम आर्मीने स्पष्ट केले आहे.
सात दिवसांत जर जागावाटपाची कार्यवाही करण्यात आली नाही, तर भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे चोपडा पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांसाठी ग्रामसेवक सौ. मनीषा महाजन, सरपंच श्री. एकनाथ कोळी तसेच ग्रामपंचायत सदस्यांना जबाबदार धरले जाईल, असा कठोर इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्याधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे की
भूमिहीन निराधार आणि बेघर नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भीम आर्मीचे हे आंदोलन प्रशासनाला जाग आणणारे ठरेल.







