
स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना
सुजाण वाचकहो, तुम्हाला घाबरवून देण्यासाठी किंवा तुम्ही चिंता करावी, यासाठी आम्ही ही बातमी करत नाही. मात्र वस्तुस्थिती अशी आहे, की आपल्या भारतात फक्त १८ दिवस पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक आहे. इंधनावर आपल्या देशात अद्यापतरी कुठलाच ठोस पर्याय उपलब्ध झालेला नाही. अनेक देशांकडून आपण इंधन आयात करतो आहोत. मात्र आखाती देशातल्या युद्धामुळे परिस्थिती खूपच गंभीर बनत चालली आहे. सुदैवानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएई देशाबरोबर आज (दि. १६) आपल्या देशात गॅसचा पुरवठा सुरळीत रहावा, यासाठीचा करार केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी
हे देशवासियांना इंधन बचत करा, परदेश दौरे टाळा, असा सल्ला देत असले तरी ते स्वतः पाच देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. याबद्दल त्यांच्यावर टीका झाली असली तरी त्यांचे हे दौरे आपल्या देशात परकीय गुंतवणूक व्हावी, यासाठी आहेत. त्यामुळे विनाकारण त्यांच्यावर टीका करणाऱ्या बिनडोक लोकांनी आत्मपरीक्षण करायला हवं
गंभीर बाब अशी आहे, की भारताकडे फक्त १८ दिवस पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक आहे. आखाती देशातलं युद्ध असंच सुरु राहिलं तर आपल्या भारतासारख्या विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा फार मोठा गंभीर असा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचत करण्याचं देशवासियांना आवाहन केलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस इराण इस्राइल युद्ध सुरू झालं होतं. त्यावेळी भारतातले तेल साठे तब्बल १५ टक्क्यांनी घटले. रिफायनरी कंपन्यांनी हे साठे वापरुन काम सुरु ठेवलं. दरम्यान, इंधन साठा असाच कमी होत राहिला तर रिफायनरी कंपन्यांना काम करणे प्रचंड अवघड जाणार आहे.
इंधन साठे कमी झाले मात्र रिफायनरी कंपन्यांनी ते साठे तेल वापरुन रिफायनरीचं काम सुरुच ठेवलं. परंतू आता इंधन पुरवठा कमी झाला तर रिफायनरी कंपन्यांना तेल प्रक्रियादेखील कमी करावी लागणार आहे. असं झाल्यास आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना रिफायनरी कंपन्यांनी प्रक्रिया केलेलं पेट्रोल आणि डिझेल मिळणं प्रचंड अवघड होणार आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे.
फेब्रुवारीच्या अखेर भारताकडे १०७ दशलक्ष बॅरल इतका इंधन साठा होता. मार्च महिन्यात तो ९५ दशलक्ष बॅरल इतका झाला आणि आता सध्या तो ९१ दशलक्ष बॅरल इतका आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला दररोज ५ दशलक्ष बॅरल इतकं तेल लागतं. दरम्यान, भारताने अमेरिकेला विनंती केली आहे, की रशियाकडून तेल साठा विकत घेण्याची यापूर्वीची दोनदा वाढवून देण्यात आलेली मुदत आता संपली असून ती पुन्हा एकदा वाढवून द्यावी. आता इंधन पुरवठ्यासाठी काही पर्याय आपल्या देशाला कदाचित सापडतीलही. परंतू आपल्या देशासारख्या जगभरातल्या २७ देशांमध्ये इंधन साठा संपत आलेला आहे. तो जर अचानक संपला तर किती भयानक परिस्थिती निर्माण होईल, याची आपण कल्पनासुद्धा करु शकत नाही.
भारतासारख्या विकसनशील देशासाठी तेलाचे साठे खूप महत्त्वाचे आहेत. बँकेत ठेवलेल्या ठेवींप्रमाणेच त्या तेलसाठ्यांना महत्त्व आहे. भारतात पूर्वी इंधन पाच दशलक्ष बॅरल आयात होत होतं. परंतू आता ४.५ दशलक्ष बॅरल आयात होत आहे. म्हणजेच ०.५० दशलक्ष बॅरलनं इंधनाची आयात कमी झाली आहे आणि आयात कमी झाली की मागणी वाढते. कारण व्यापाराचा नियम हेच सांगतो, की पुरवठा कमी झाला, की मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. जसजसा आपण तेलाचा साठा वापरत राहू, तसतशी आयात कमी होत जाणार आहे. ही सारी तफावत व्यवस्थित करणं सरकारी यंत्रणेला मोठं अवघड जाणार आहे






