
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी गावात सुरू असलेल्या अवैध गावठी पन्नी दारू विक्रीविरोधात आता महिलांनीच थेट रणशिंग फुंकले असून, ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच दिपक नागो पाटील यांना १०० हून अधिक महिलांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे.
गावात खुलेआम सुरू असलेल्या गावठी पन्नी दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप महिलांनी निवेदनातून केला आहे. विशेषतः युवक व्यसनाधीन होत असून महिलांना घरगुती त्रास, भांडणे आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागत असल्याची संतप्त भावना महिलांनी व्यक्त केली.
महिलांनी दिलेल्या निवेदनात गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच गावात पोलीस गस्त वाढवण्यात यावी, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. “गाव उद्ध्वस्त करणारा हा अवैध धंदा बंद झाला नाही तर महिलांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.
साकळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच दिपक नागो पाटील यांना हे निवेदन देताना महिलांची मोठी उपस्थिती होती. निवेदनावर १०० पेक्षा अधिक महिलांच्या सह्या असल्यामुळे गावातील संताप किती तीव्र आहे, हे स्पष्टपणे दिसून आले.
दरम्यान, गावातील काही दारू विक्रेते कोणाच्याही भीतीशिवाय खुलेआम व्यवसाय करत असल्याची चर्चा गावात सुरू असून, अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. “अखेर या अवैध धंद्यांना संरक्षण कोण देत आहे?” असा सवाल आता ग्रामस्थ उघडपणे विचारू लागले आहेत.
महिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे साकळी गावातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा अधिकच तापला असून, आता ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग काय भूमिका घेतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







