
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते १२वी पर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या चांगल्या निर्णयाचा जामखेड एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थीनींना फटका बसत आहे.
दोन ते तीन तास बसची वाट पहावी लागत आहे. कधी कधी तर बसच येत नाही यामुळे विद्यार्थीनींना चार पाच किलोमीटर अंतरावर उन्हात
पायपीट करत जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.
यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच वेळही वाया जात आहे.
ग्रामीण भागातील मुलींना शाळेत ये-जा करण्याची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोफत पास देण्याची सोय केली आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना हा लाभ मिळतो.
सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळच्या सत्रात शाळा आहेत शाळेचे वेळेचे वेळापत्रक जामखेड आगाराला दिले आहे. कधी सकाळची गाडी येत नाही तर कधी दुपारी येत नाही कधी कधी दोन तास उशिरा येते. यामुळे परिक्षेच्या काळात पेपरला उशीर होत आहे.
आज बुधवार पिंपळवाडी येथील मुली सकाळी सहा साडेसहा पासून बसची वाट पाहत होत्या सव्वा सात वाजता विद्यार्थीनींचा फोन आला अद्याप बस आलेली नाही तेव्हा जामखेड एसटी महामंडळाचे डेपो मॅनेजर प्रमोद जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले बस चे नियोजन केले होते मी पाहतो परत पाच मिनिटांनी फोन केला असता ते म्हणाले बस सोडलेली आहे. ड्रायव्हर फोन उचलत नाही बस येईल पण बस आलीच नाही. यामुळे मुलींना पायपीट करत शाळेत यावे लागले. पेपरला अर्धा एक तास उशीर झाला.
बसला उशीर झाला की पालक, विद्यार्थी शिक्षकांना फोन करतात शिक्षक बस डेपो मध्ये फोन करतात यावेळी अनेक संबंधीत अधिकारी फोन उचलत नाहीत. यामुळे शिक्षकांनाही नेमके सांगता येत नाही. अनेक वेळा विद्यार्थ्यांना उन्हा तान्हात पायपीट करावी लागते. अनेक वेळा पेपर बुडतो केवळ बस महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
एसटी महामंडळाचा गलथान कारभार
वाहतूक नियंत्रक कक्षातील फोन बंद असतो.
अधिकारी खरी माहिती देत नाहीत.
बस येणार नसली तरी अधिकारी बस येईल म्हणून सांगतात. यामुळे मुलींना घरी जाण्यासाठी अनेक वेळा उन्हा तान्हात पायपीट करावी लागते, अनेक वेळा पेपरही बुडतो. विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते







