
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
यावल पश्चिम व पूर्व विभागाच्या वनक्षेत्रात येणाऱ्या इचखेडा मार्गावरील खालकोट वनराई परिसरात मोठ्या प्रमाणावर सागवानासह इतर मौल्यवान वृक्षांची तोड सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या कथित वृक्षतोडीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जंगल संवर्धनाच्या नावाखालीच जंगल साफ करण्याचा प्रकार सुरू असून रात्रीच्या वेळी व दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचे दिसून येत आहे. सागवानासारख्या मौल्यवान वृक्षांवर कुरघोडी केली जात असून लाकूड माफियांचा वावर वाढल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे “ही वृक्षतोड नेमकी कोणाच्या छत्रछायेखाली सुरू आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर या प्रकरणात वन विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची संपत्ती व कामकाज तपासण्याची मागणी केली आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, या भागातील वनराई ही स्थानिक हवामान, भूजल पातळी आणि जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने अंधाधुंद वृक्षतोड सुरू राहिल्यास भविष्यात दुष्काळ, मृदस्खलन व वन्यजीवांचा ऱ्हास यासारखे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
दरम्यान, नागरिकांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ वनसंरक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि सुरू असलेली कथित वृक्षतोड त्वरित थांबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
या प्रकरणी वन विभागाकडून अधिकृत भूमिका समोर येणे अपेक्षित आहे.






