
जळगाव : ज्या डॉक्टरांना आपण ‘देवदूत’ मानतो, तेच आता ‘राक्षस’ बनून वावरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जळगावातील ‘हार्ट प्लस हॉस्पिटल’ मध्ये काम करणाऱ्या एका असहाय्य नर्सचा विनयभंग करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉ. संदीप भारुडे आणि त्याला साथ देणारी त्याची पत्नी डॉ. प्रीती भारुडे या विकृत दांपत्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण जळगाव शहर हादरले असून वैद्यकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
नेमका प्रकार काय?
जळगावातील बीएसएनएल ऑफिससमोरील ‘हार्ट प्लस हॉस्पिटल’ मध्ये पीडित विवाहिता २२ जुलै २०२५ रोजी नर्स म्हणून रुजू झाली होती. मात्र, रुग्णांची सेवा करण्यासाठी आलेल्या या महिलेवर रुग्णालयाचे संचालक डॉ. संदीप भारुडे याची वक्रदृष्टी पडली. सुरुवातीला “तुला काम जमत नाही,” असे म्हणत मानसिक छळ करण्यात आला. मात्र, हा केवळ बहाणा होता. त्यानंतर या नराधम डॉक्टरने पीडितेला वारंवार केबिनमध्ये बोलावून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.
हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा नोव्हेंबर महिन्यात या वासनांध डॉक्टरने उघडपणे पीडितेकडे ‘शरीरसुखाची मागणी’ केली. एका उच्चशिक्षित डॉक्टरची ही नीच मानसिकता समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.
पत्नीचीही गुन्हेगारी साथ: ‘स्त्री’च बनली ‘स्त्री’ची शत्रू!
या प्रकरणात डॉक्टरची पत्नी डॉ. प्रीती भारुडे हिची भूमिका तर अधिकच संतापजनक आहे. स्वतः एक स्त्री असूनही, पतीच्या विकृत कृत्यांना आळा घालण्याऐवजी तिने पीडितेचे चारित्र्यहनन करण्यास सुरुवात केली. एम.आर.सोबतच्या संभाषणावरून पीडितेला टोमणे मारणे आणि तिचा मानसिक छळ करणे, असे प्रकार डॉ. प्रीती यांनी केले. एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या इज्जतीचे धिंडवडे काढणे कितपत योग्य आहे?
मुलांना मारण्याची धमकी: गुन्हेगारी वृत्तीचा कळस!
पीडितेने या अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला असता, या डॉक्टर दांपत्याने गुन्हेगारी जगतालाही लाजवेल अशी धमकी दिली. “तुला आणि तुझ्या दोन्ही मुलांना कोणतेही औषध देऊन संपवून टाकेल,” अशी जीवघेणी धमकी देत पीडितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. या भीतीपोटी पीडित महिलेने नोकरी सोडली, पण अखेर हिंमत एकवटून तिने पोलिसांत धाव घेतली.
जनतेचा सवाल: अशा नराधमांना कठोर शिक्षा कधी?
दि. २५ सप्टेंबर ते १८ जानेवारी या काळात हा नंगा नाच सुरू होता. आता जिल्हापेठ पोलिसांनी या डॉक्टर दांपत्यावर गुन्हा दाखल केला असला तरी, केवळ कागदी कारवाई न करता अशा विकृतांना गजाआड करून त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.







