
अहिल्यानगर | प्रशांत बाफना
राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर- मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून प्रवासी, वाहनचालक व स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदाराला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या हस्तक्षेपानंतर काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरीत प्रत्यक्ष उपस्थित राहून नगर- मनमाड मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्त्यावर थांबून नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.
मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे राहुरीकरांना सहन करावा लागलेल्या त्रासाबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त करत, जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. केवळ फोटो-व्हिडिओपुरते काम न करता प्रत्यक्ष प्रश्न सुटले पाहिजेत, हीच माझी भूमिका आहे,असे ठामपणे सांगितले. यावेळी देवळाली प्रवरा येथील नगरसेवक ऋषभ लोढा, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, महेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महामार्गाच्या संथ कामावर नाराजी
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महामार्गाच्या संथ कामावरही नाराजी व्यक्त केली. वेळेत काम पूर्ण न झाल्यास नागरिकांचा संयम सुटेल, असा इशारा देत त्यांनी संबंधित कंत्राटदार व यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत दिले. कामाचा वेग वाढवला, तरच कायमस्वरूपी दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.
होमगार्डचा पगार डॉ. विखे पाटील देणार
जे निवडून आले, ते काही करत नाहीत, म्हणून माझ्यासारख्या पडलेल्या कार्यकर्त्याला ही जबाबदारी उचलावी लागत आहे, असे विखे म्हणाले. ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ अपुरे आहे, तेथे होमगार्डची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी करत नागरिकांचा त्रास कमी व्हावा, वाहतूक सुरळीत व्हावी. प्रशासन अपयशी ठरले, तर गरज भासल्यास होमगार्डचा पगार मी स्वतः देईन, असे आश्वासन डॉ. विखे पाटील दिले.
काम करणारा माणसाला निष्ठावान कार्यकर्त्यांची साथ
मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणारा माणूस आहे. निष्ठावान व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची साथ मला लाभली, हे माझं भाग्य आहे. आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत, तर नेत्याने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करतात. आज त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली. जिथे ट्रॅफिक जाम आढळेल, तिथे आमचे कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेऊन नियोजन करतील. असे देखील विखे पाटील म्हणाले.
नागरिकांच्या जीवाशी खेळ; हलगर्जीपणा सहन नाही होणार
वाहतूक कोंडीवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी पोलिस प्रशासन व संबंधित विभागांना स्पष्ट शब्दांत सुनावले. संवेदनशील ठिकाणी तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे. वाहतूक वळवण्यासाठी नियोजित पर्यायी मार्ग त्वरित सुरू करावेत. काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचनाफलक, रिफ्लेक्टर आणि प्रकाशव्यवस्था वाढवावी. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले







