
स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना 8055440385
महाराष्ट्र आज विकासाच्या मोठमोठ्या घोषणा ऐकत आहे. कोट्यवधींचे प्रकल्प जाहीर होत आहेत, नवे रस्ते उभे राहत आहेत, उद्योग वाढत आहेत; पण या विकासाच्या गोंगाटात एक अत्यंत भीषण प्रश्न शांतपणे प्रत्येक घरात शिरत आहे सामान्य माणसाच्या ताटात आज नेमके काय वाढले जात आहे?
आज बाजारात मिळणारे अनेक खाद्यपदार्थ हे अन्न कमी आणि विष अधिक बनले आहेत. दूधामध्ये भेसळ, बनावट पनीर, कृत्रिम बटर, रासायनिक पदार्थांनी पिकवलेली फळे, निकृष्ट मिठाई, विषारी खाद्यतेल आणि बॉयलर चिकनमध्ये होणारा केमिकलचा वापर… या सगळ्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यावर मोठा घाला घातला आहे.
विशेषतः बॉयलर चिकन उद्योगाबाबत सातत्याने गंभीर तक्रारी समोर येत आहेत. अल्पावधीत कोंबड्यांची वाढ व्हावी यासाठी विविध इंजेक्शन्स, औषधे आणि केमिकल्सचा अतिवापर केला जात असल्याचे आरोप होत आहेत. हेच चिकन आज सामान्य कुटुंबांच्या ताटात पोहोचत आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण हेच अन्न खात आहे आणि त्यातून भविष्यात गंभीर आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज महाराष्ट्रातील आई घाबरलेली आहे. बाजारातून आणलेले दूध शुद्ध आहे की बनावट, याची खात्री तिला राहिलेली नाही. मुलांच्या डब्यात जाणारे पनीर सुरक्षित आहे का, हा प्रश्न पालकांना सतावत आहे. फळे नैसर्गिक आहेत की केमिकलयुक्त, हेही ओळखता येत नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यात अन्नाविषयीच भीती निर्माण झाली आहे.
कॅन्सर, हार्मोनल विकार, पचनसंस्थेचे आजार आणि इतर गंभीर आजारांचे वाढते प्रमाण पाहता हा विषय केवळ अन्नाचा नाही, तर लाखो कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न बनला आहे. पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी काही लोक थेट जनतेच्या जीवाशी खेळत आहेत.
अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरा आता अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लागल्या आहेत. कारण या विभागाचे आयुक्त श्री तुकाराम मुंढे हे कठोर, प्रामाणिक आणि धाडसी अधिकारी म्हणून संपूर्ण राज्यात ओळखले जातात. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराविरोधात कठोर भूमिका घेणारा अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच आज सामान्य जनतेच्या मनात एक आशा निर्माण झाली आहे — “तुकाराम मुंढे साहेब महाराष्ट्राच्या ताटातील हे विष थांबवतील का?”
जनतेची अपेक्षा केवळ छापेमारीपुरती नाही. मोठमोठ्या भेसळ रॅकेट्सवर कठोर कारवाई व्हावी, दोषींना शिक्षा व्हावी, केमिकलयुक्त अन्न विकणाऱ्यांचे परवाने रद्द व्हावेत आणि सामान्य माणसाला सुरक्षित अन्न मिळावे, ही जनतेची खरी मागणी आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांना वाटते की, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवून सलग काही वर्षे याच विभागात काम करण्याची संधी मिळाली, तर अन्न भेसळीविरुद्ध मोठे युद्ध उभे राहू शकते. कारण कठोर इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रशासन असेल, तर भेसळ माफियांना रोखणे अशक्य नाही.
आज प्रत्येक आई आपल्या मुलासाठी सुरक्षित अन्न मागत आहे. प्रत्येक कुटुंब निरोगी आयुष्याची अपेक्षा करत आहे. सरकार जर खऱ्या अर्थाने जनतेच्या आरोग्याबाबत गंभीर असेल, तर अन्न भेसळीविरुद्ध निर्णायक आणि सातत्यपूर्ण मोहीम उभारावी लागेल.
तुकाराम मुंढे साहेब, महाराष्ट्राच्या जनतेच्या ताटात आज विष उतरले आहे. लाखो नागरिकांच्या नजरा आता आपल्याकडे आशेने पाहत आहेत. कारण हा प्रश्न फक्त अन्नाचा नाही… तर पुढच्या पिढीच्या आयुष्याचा आहे.






