
केबल टाकणाऱ्या कंत्राटदाराचा मनमानी कारभार आणि महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. वाघ नगर, दत्त मंदिर रोड परिसरात केबल टाकण्याचे काम सुरू असताना, जेसीबी चालकाने आणि ठेकेदाराने नागरिकांच्या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ‘अमृत’ योजनेची मुख्य जलवाहिनी (पाईपलाईन) दोन ठिकाणी तोडून टाकली. विशेष म्हणजे, आज या घटनेला तिसरा दिवस उजाडला तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात संपूर्ण कॉलनीवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
’पुढे अमृतची लाईन आहे’, सांगूनही चालवला जेसीबी!
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्त मंदिर रोडवर जेव्हा केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू होते, तेव्हाच जागरूक नागरिकांनी ठेकेदार आणि जेसीबी चालकाला स्पष्ट शब्दांत कल्पना दिली होती की, “या मार्गावरून पुढे संपूर्ण कॉलनीची अमृत योजनेची मुख्य पाईपलाईन गेली आहे, त्यामुळे काळजीपूर्वक काम करा.” परंतु, कॉलनीवासीयांच्या या सूचनेला केराची टोपली दाखवत, संबंधित कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे आणि बेजबाबदारपणे खोदकाम सुरूच ठेवले. परिणामी, काही वेळातच मुख्य पाईपलाईन दोन वेगवेगळ्या ठिकाणी गंभीररीत्या फुटली.
चूक करून ठेकेदार पळाला; तिसऱ्या दिवशीही पाण्याचा टिपूस नाही!
पाईपलाईन फुटल्याचे आणि पाण्याचा अपव्यय होत असल्याचे पाहताच, चूक सुधारण्याऐवजी ठेकेदार आणि जेसीबी चालक तिथून पळ काढून निघून गेले. आज सलग तिसरा दिवस आहे, मात्र ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी ना ठेकेदाराने तसदी घेतली, ना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली. ऐन मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळे महिला वर्ग आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
नागरिकांचा आक्रमक सवाल:
“ठेकेदारांच्या या मनमानीवर प्रशासनाचा वचक का नाही? नागरिकांनी आधीच पूर्वकल्पना दिली असतानाही नुकसान करणाऱ्या या बेजबाबदार कंत्राटदारावर गुन्हे दाखल का होत नाहीत? आमच्या हक्काच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवणाऱ्यांना जाब कोण विचारणार?”
…तर तीव्र आंदोलन छेडणार!
या गंभीर प्रकारामुळे वाघ नगर परिसरातील नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे. तात्काळ २४ तासांच्या आत ही पाईपलाईन युद्धपातळीवर दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा मनपा प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या विरोधात कॉलनीतील नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा संतप्त रहिवाशांनी दिला आहे.







