
प्रशांत बाफना 8055440385
डॉ डी एस काटे यांनी लिहिलेला “वऱ्हाड निघालं बैलगाडीत” हा लेख केवळ एका लग्नसोहळ्याच्या आठवणी सांगणारा नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा, त्या काळातील साधेपणाचा आणि नात्यांतील जिव्हाळ्याचा एक जिवंत दस्तऐवज आहे. १९६० ते ७० च्या दशकातील खेड्यातील लग्नसंस्कृती, माणुसकी आणि सामाजिक मूल्यांचे हे प्रभावी चित्रण वाचकाला थेट त्या काळात घेऊन जाते.
त्या काळात ग्रामीण भागात दळणवळणाची साधने अत्यल्प होती. चारचाकी वाहने, बस किंवा खासगी प्रवासाची सोय फार कमी असल्याने लग्नासाठी जाणारे वऱ्हाड बैलगाड्यांमधूनच निघत असे. बैलगाडी ही केवळ प्रवासाचे साधन नव्हती, तर ती गावच्या प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जायची. जितक्या अधिक बैलगाड्या, तितके मोठे वऱ्हाड आणि तितकी मोठी आसामी असे समजले जाई.
गाडीत बैलांसाठी ज्वारीची वैरण, पेंड आणि पाणी ठेवले जाई. त्यावर सतरंजी किंवा घोंगडी टाकून वऱ्हाडी मंडळी बसत. लहान मुले, महिला, वृद्ध अशी सर्व मंडळी आनंदाने गप्पा मारत, गाणी म्हणत प्रवास करत असत. आजच्या वातानुकूलित गाड्यांपेक्षा त्या बैलगाड्यांमधील प्रवासात एक वेगळीच आत्मीयता आणि आनंद होता.
लेखात बैलगाडीशी संबंधित अनेक बारकावेही अत्यंत सुंदरपणे मांडले आहेत. गाडीच्या चाकाला वंगण घालण्यासाठी बांबूच्या नळीचा वापर केला जाई, त्याला “नळा” म्हटले जाई. त्यावरून आलेली “गाड्याबरोबर नळ्याची यात्रा” ही म्हण लेखकाने उल्लेखून ग्रामीण बोलीभाषेचे सौंदर्यही जपले आहे.
वऱ्हाड गावात पोहोचल्यावर गावाच्या वेशीवर नवरीकडील मंडळी पाण्याचा हंडा, पानसुपारी घेऊन स्वागत करत असत. हा सन्मान म्हणजे केवळ औपचारिकता नव्हती, तर पाहुण्यांबद्दलचा आदर आणि संस्कारांचे दर्शन होते. वऱ्हाडासाठी स्वतंत्र “जानूस घर” दिले जाई. महिलांना, मुलांना सुरक्षितपणे उतरण्याची व्यवस्था केली जाई. वरमायांना वाजतगाजत मंडपात आणले जाई. जर तो मान दिला नाही तर रुसवे-फुगवेही होत.
आजच्या भव्य स्टेजच्या तुलनेत त्या काळातील “बोहल” अत्यंत साधा असे. मातीचा किंवा लाकडाचा थोडा उंचवटा करून त्यावर नवरा-नवरी उभे राहत आणि धार्मिक विधी पार पडत. मंडपात आंबा आणि जांभळाच्या पानांचे ढेगळे बांधले जात. संपूर्ण लग्नसोहळा निसर्गाशी जोडलेला आणि साधेपणाने नटलेला असे.
लेखातील सर्वात प्रभावी आणि विचार करायला लावणारा भाग म्हणजे हुंड्याचा प्रसंग. लेखक करवला म्हणून लग्नात मानाच्या भूमिकेत असतात. त्यावेळी नवरदेव रुसून बसतो आणि “घड्याळ” मिळाल्याशिवाय लग्नासाठी तयार होत नाही. लेखक मध्यस्थी करतात. त्यांना वाटते की आपण मोठे मुत्सद्दी काम केले. चुलते स्वतःचे घड्याळ देऊन लग्न पार पाडतात.
परंतु लग्नानंतर चुलत्यांनी लेखकाच्या कानाखाली मारून दिलेला संदेश अत्यंत मोलाचा ठरतो —
“हुंडा मागायचा नसतो.”
हा प्रसंग लेखाचा आत्मा आहे. सुरुवातीला विनोदी वाटणारी घटना शेवटी सामाजिक प्रबोधन करणारी ठरते. चुलत्यांनी फक्त कानाखाली मारली नाही, तर पुढील पिढीला योग्य संस्कार दिले. हुंडा ही चुकीची प्रथा आहे, हे त्यांनी कृतीतून शिकवले.
आजच्या काळात विवाहसोहळे अधिक आधुनिक, खर्चिक आणि दिखाऊ झाले आहेत. डीजे, लाईटिंग, महागडे हॉल, लक्झरी गाड्या या गोष्टींमध्ये जुन्या संस्कृतीतील साधेपणा हरवत चालल्याची भावना हा लेख वाचताना निर्माण होते. त्या काळात पैसा कमी होता, पण माणुसकी, आपुलकी आणि नात्यांमधील उब अधिक होती.
“वऱ्हाड निघालं बैलगाडीत” हा लेख म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची जपणूक आहे. जुन्या आठवणींच्या माध्यमातून तो केवळ भूतकाळ दाखवत नाही, तर वर्तमानालाही आरसा दाखवतो. साधेपणा, संस्कार आणि सामाजिक मूल्ये जपण्याचा संदेश देणारा हा लेख प्रत्येक पिढीने वाचावा असा आहे






