
तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर
यावल : तालुक्यातील वनोली गावात अतिक्रमणधारकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून ग्रामपंचायत प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सरपंच व ग्रामसेवक राजकीय दबावाखाली काम करत असल्याची चर्चा आता संपूर्ण गावात उघडपणे सुरू झाली आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार सतीश योगराज चौधरी व विजय योगराज चौधरी यांनी गावातील अनेक ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण करून आर.सी.सी. बांधकामे उभारली आहेत. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तींना शासनाकडून घरकुल मंजूर असतानाही ते घरकुल भाड्याने देऊन दुसरीकडे जागोजागी अतिक्रमण करून गावाच्या शासकीय व ग्रामपंचायत जागा बळकावल्या जात असल्याचा आरोप आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधितांचे मूळ गाव म्हैसवाडी असून तिथेही त्यांच्या नावे उतारा असल्याची नोंद आहे. तरीही वनोली गावात येऊन शासकीय जागांवर कब्जा करत घरांची बांधकामे उभारली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ग्रामस्थांनी पंचायत समिती यावल व ग्रामपंचायत वनोली येथे वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत. जिओ-टॅग फोटो, उतारे, तसेच प्रत्यक्ष जागेवरील पुरावेही प्रशासनाकडे दिले आहेत. मात्र कारवाईच्या नावाखाली केवळ “नोटीस पाठवत आहोत” असे उत्तर देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित अतिक्रमणधारकांनी वकिलामार्फत ग्रामपंचायतीला नोटीस बजावून ग्रामपंचायतने दिलेली नोटीसच “खोटी व चुकीची” असल्याचा दावा केला आहे. म्हणजेच ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींनाच चुकीचे ठरवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे. तरीही ग्रामपंचायत प्रशासन कुठलीही ठोस पावले उचलत नसल्याने “अतिक्रमणधारकांना अभय दिले जात आहे का?” असा सवाल गावात उपस्थित केला जात आहे.
ग्रामसेवक प्रवीण चौधरी कोणत्या भीतीपोटी कारवाई करत नाहीत? सरपंचांवर कोणाचा राजकीय दबाव आहे? अतिक्रमणधारक ग्रामपंचायतीच्या आदेशांना जुमानत नाहीत, तरीही प्रशासन हातावर हात ठेवून का बसले आहे? असे गंभीर प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.
या प्रकरणात तहसीलदार यावल, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तसेच ग्रामपंचायत वनोली यांना अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करूनही अद्याप कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उफाळून आला आहे. “कारवाई नाही झाली तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल,” असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट मागणी केली आहे की, संबंधित अतिक्रमण तत्काळ हटवावे, बांधकामांवर बुलडोझर कारवाई करावी, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.






