
पाच दिवसांपासून जळगावात आंदोलन सुरू; डॉक्टरांनीही फिरवली पाठ, सट्टा-पत्ता चालकांशी प्रशासनाचे लागेबांधे असल्याचा संशय!
जळगाव विशेष प्रतिनिधी:
जळगाव शहराला लागलेली अवैध सट्टा-पत्ता आणि जुगाराची कीड मुळासकट उपटून टाकण्यासाठी भर उन्हात महिला जिल्हाध्यक्ष स्वराज्य शक्ती सेना जळगांव प्राजक्ता तायडे यांचे आमरण उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. मात्र, अत्यंत संतापजनक बाब म्हणजे जळगाव पोलीस प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. एका महिला लोकप्रतिनिधीच्या प्रकृतीशी प्रशासन जाणीवपूर्वक खेळत असल्याचे चित्र आता स्पष्टपणे समोर येत आहे.
प्रकृती चिंताजनक: बीपी कमी झाले, तरीही उपचार मिळेना!
उपोषणामुळे प्राजक्ता तायडे यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. तीन दिवसांपूर्वी सरकारी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांचे ब्लड प्रेशर (BP) कमालीचे कमी झाल्याचे समोर आले होते. “मोठ्या डॉक्टरांशी बोलून पुढील उपचार करू” असे सांगून गेलेले डॉक्टर पुन्हा फिरकलेच नाहीत. प्रशासनाने या गंभीर स्थितीकडे डोळेझाक केली असून, उपोषणकर्त्या महिलेचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सुरू आहे.
प्रशासनाचे सट्टा-पत्ता चालकांशी ‘फेव्हिकॉलचे’ नाते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पवित्र पर्वावर जळगाव सट्टामुक्त व्हावे, ही साधी मागणी घेऊन प्राजक्ता तायडे शिवाजी महाराज पुतळ्यासमोर बसल्या आहेत. मात्र, पाच दिवस उलटूनही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी साधी विचारपूसही केली नाही. यामुळे जळगावातील हे अवैध धंदे नेमके कोणाच्या वरदहस्ताने सुरू आहेत? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. सट्टा चालकांसाठी प्रशासन एका महिलेचा बळी घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आता जनतेचा संयम सुटणार!
प्राजक्ता तायडे यांनी सुरुवातीलाच इशारा दिला होता की, हा लढा संविधानिक आणि आरपारचा आहे. जर येत्या २४ तासांत प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नाही आणि प्राजक्ता तायडे यांच्या प्रकृतीला काही इजा झाली, तर जळगावातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
“प्रशासन जर सट्टा चालकांच्या खिशात असेल, तर आम्ही आमचा लढा अधिक तीव्र करू. प्राजक्ता तायडे यांच्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास जिल्हा पोलीस प्रशासन आणि राज्य शासन याला सर्वस्वी जबाबदार राहील!” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या आमरण उपोषणास वंचित बहुजन आघाडी चे जितेंद्र केदार व आझाद समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष सतिश गायकवाड यांनी पाठिंबा दर्शवला आहे
वृत्त संकलन:
दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव.






