
नाशिक/प्रशांत बाफना
नाशिकच्या दिंडोरीमध्ये एका आनंदाच्या सोहळ्याचे रुपांतर अतीव दु:खात झाले असून, विहीर दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. स्नेहसंमेलन आटोपून घरी पतरणार्या दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात आले होते.
कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर सर्वजण आपल्या ‘इर्टिका’ कारने (क्रमांक एमएच15-जेएस-1053) घराकडे परतत होते. रात्री 10 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील राजू राजे यांच्या विहिरीजवळ चालकाचा कारवारील ताबा सुटला.
यांनतर भरधाव कार थेट पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळली. अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, विहीर खोल आणि पाण्याने भरलेली असल्याने कारचा शोध घेणं कठीण जाणं होतं. त्यातच रात्रीचा दाट अंधार असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफ चे पथक घटनास्थळी दाखल झाले. शेवटी क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीबाहर काढण्यात आली, मात्र तोपर्यंत आतील नऊही जणांचा श्वास थांबला होता.
दरम्यान, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी रुग्णालयात भेट दिली असता, नागरिकांनी त्यांना घेराव घालत तक्रारींचा पाढा वाचला. विहिरीला संरक्षण कठडा नसणे, रस्त्याचे अर्धवट काम आणि क्लास व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यावर स्थानिकांनी झिरवाळांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. “ जर विहिरीला जाळी असती किंवा कठडा उंच असता, तर आज 9 जीव वाचले असते,” असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी झिरवाळ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “ हा दिंडोरीसाठी काळा दिवस आहे. विहिर मालकाने घराला कंपाउंड केले, मग विहिरीला का नाही? नगरपालिकेनेही रस्ता तिथेच संपवला, तिथे सुरक्षा असणे गरजेचे होते. एकाच कुटुंबातील 9 जण जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे” असं मंत्री झिरवाळ म्हणाले.
विहिर मालकावर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा : ज्या खाजगी क्लाच्या स्नेहसंमेलनावरून हे कुटुंब परतत होतं, त्या क्लास संचालक सचिन वडजे यांचीही आता पोलीस चौकशी करणार आहेत. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम घेण्यासाठी अधिकृत परवानगी होती का? सुरक्षिततेचे नियम पाळले होते का? या बाबींची तपासणी केली जाणार आहे. या भीषण दुर्घटनेनंतर विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, खाजगी क्लास संचालकाच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळाची पाहणी करून मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
विहिर मालकाचे नातेवाईक अॅड. विक्रम राजे यांनी सांगितले की, “ही विहिर 1972 पासूनची असून गावाला पाणीपुरवठा करते. तिथे जाळी आणि अँगल होते, मात्र कोणीतरी ते काढून नेले. नगपंचायतीने तिथे जाळी बसवणे गरजेचे होते,”
शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात सुनील दरोडे (32) यांच्यासह कुटुंबातील 6 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 7 ते 14 वयोगटातील या चिमुरड्यांच्या मृत्यूमुळे इंदोरे गावावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये सुनील दत्तात्रय दरगोडे (वय 32), रेशमा सुनील दरगोडे (वय 27), आशा अनिल दरगोडे (वय 32), गुणवती सुनील दरगोडे (वय 11) श्रेयश अनिल दरगोडे (वय 11), श्रावणी अनिल दरगोडे (वय 11), सृष्टी अनिल दरगोडे (वय 14), समृद्धी राजेंद्र दरगोडे (वय 7), श्रद्धा अनिल दरगोडे (वय 13) यांचा समावेश आहे







