
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन ; अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीवर कठोर कारवाईचा इशारा
फैजपूर : मारूळ या गावात आगामी बकरी ईद सण शांततेत, सामाजिक सलोखा व बंधुभावाच्या वातावरणात पार पडावा तसेच कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी फैजपूर पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून ग्रामीण भागात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज दिनांक 19 मे 2026 रोजी ता. यावल येथील मारूळ गावात फैजपूर पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस मा. श्री अनिल बडगुजर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर विभाग यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील प्रतिष्ठित नागरिक, मशिदीचे पंच मंडळी, गुरे व्यापारी, कुरेशी समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मा. बडगुजर साहेब यांनी आगामी बकरी ईद सण साजरा करताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. कोणत्याही प्रकारे सामाजिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, गावातील शांतता व सौहार्द अबाधित ठेवावे तसेच धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
विशेषतः कोणत्याही परिस्थितीत गोवंशाची कत्तल करण्यात येऊ नये, गोवंशाची अवैध वाहतूक करण्यात येऊ नये तसेच संशयास्पद वाहतूक आढळून आल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच कोणत्याही प्रकारचे मांस उघड्यावर विक्री करू नये, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच मांसाची अवैधरित्या वाहतूक केल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला.यावेळी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट, धार्मिक भावना दुखावणारे संदेश किंवा समाजात द्वेष निर्माण करणारे फोटो व व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले. कोणतीही चुकीची माहिती पसरवून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर सायबर कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.बैठकीमध्ये उपस्थित गुरे व्यापाऱ्यांना देखील आवश्यक कागदपत्रे, वाहतूक नियम व शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. धार्मिक सणाच्या नावाखाली बेकायदेशीर प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे ठामपणे सांगण्यात आले.मारूळ गावातील नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. गावातील शांतता, एकोपा व बंधुभाव कायम राखण्यासाठी सर्व समाज एकत्रितपणे प्रयत्न करतील, असे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.फैजपूर पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकारामुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेबाबत जनजागृती निर्माण होत असून नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. बकरी ईद सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त व सतर्कता ठेवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.मारूळ गावात पार पडलेली ही बैठक सामाजिक सलोखा, कायद्याचे पालन आणि शांततेचा संदेश देणारी ठरली असून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.







