
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी गावात ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. विशेषतः महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था आणि आंबेडकर नगर परिसरातील अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायतीची उदासीनता उघडपणे समोर आली आहे.
दैनिक “हॅलो बातमीदार”च्या माध्यमातून वारंवार या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधूनही ग्रामपंचायत प्रशासन बेजबाबदारपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. गावातील महिलांना स्वच्छतागृहाच्या वापरासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून परिसरात घाणीचे ढीग, नादुरुस्त गटारी आणि रस्त्यावर साचलेले सांडपाणी यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
याहून धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या समस्या मांडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांकडे गेलेल्या नागरिकांना उलट उडवाउडवीची व उद्धट उत्तरे दिली जात आहेत. “आम्हाला सांगू नका, आम्ही लगेच काम करणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा!” अशा स्वरूपाची बेजबाबदार भाषा वापरून वार्ड क्रमांक १ मधील सदस्यांकडून नागरिकांचा अपमान केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे.
दरम्यान, काही ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी स्वतःला जणू गावाचे “मालक” समजू लागल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सेवा देण्याऐवजी हुकूमशाही पद्धतीने वागणूक देत नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ग्रामपंचायत केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी दिखाऊ स्वच्छतेवर भर देत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तपासणी अधिकारी येणार असलेल्या ठिकाणीच स्वच्छता राखली जाते, मात्र उर्वरित गाव पूर्णपणे दुर्लक्षित ठेवले जात आहे. ही दुटप्पी भूमिका ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
दरम्यान, या गैरकारभाराविरोधात बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे काही पदाधिकारी पत्रकारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असून, अवमानकारक भाषा वापरून त्यांना अपमानित केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट गदा असल्याचे स्पष्ट होत आहे.
साकळी गावातील ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, संबंधित प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संपूर्ण गावात समान पद्धतीने स्वच्छतेची कामे हाती घ्यावीत, आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे.
“सेवक नव्हे तर मालक बनणाऱ्यांना धडा शिकवाच!” — साकळीकरांचा इशारा






