
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील किनगाव येथील नव्याने उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वीज कनेक्शन, पाण्याची सुविधा आणि डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालय सुरूच झाले नाही. मात्र या बंद रुग्णालयासाठी तब्बल ९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना दोन वर्षांपासून नियमित पगार दिला जात असल्याची माहिती समोर येताच प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
याबाबत संपर्क साधला असता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांनी सांगितले की, सध्या रुग्णालयात वीज कनेक्शन व पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सेवा सुरू होऊ शकली नाही. मात्र आठ दिवसांत वीज व पाण्याची व्यवस्था करण्यात येईल आणि डॉक्टर उपलब्ध झाल्यास ग्रामीण रुग्णालय लवकरच सुरू केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र दुसरीकडे या रुग्णालयात नियुक्त करण्यात आलेल्या ९ कर्मचाऱ्यांना गेली दोन वर्षे कोणतेही काम नसताना पगार मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यापैकी दोन कर्मचारी निवासस्थानी राहत असले तरी इतर कर्मचारी भुसावळ, जळगावसह विविध ठिकाणांवरून ये-जा करत असल्याची माहिती आहे. हे कर्मचारी केवळ मस्टरवर सही करण्यासाठी येतात, काही वेळ थांबतात आणि परत निघून जातात, असेही स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे शासनाची मोठी दिशाभूल झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. रुग्णालय बंद असताना कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी झाली? दोन वर्षे पगार कसा दिला गेला? याबाबत प्रशासनाने तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
किनगाव परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी अजूनही दूरच्या रुग्णालयात जावे लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले रुग्णालय बंद आणि कर्मचारी मात्र पगारी हा प्रकार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा संतप्त सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
आता वीज, पाणी आणि डॉक्टरांची व्यवस्था करून प्रशासन खरोखरच आठ दिवसांत रुग्णालय सुरू करणार का? की हा विषय पुन्हा थंड बस्त्यात जाणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.







