
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात गंभीर प्रकार समोर येत असून, अनेक ठिकाणी वन अधिकारी व वनपाल हे नियुक्त करण्यात असताना मुख्यालयावर न राहता बाहेरून ये-जा करत असल्याच्या तक्रारी जोर धरत आहेत. वनसंवर्धन, अवैध वृक्षतोड रोखणे, वनआग नियंत्रण आणि गस्त यासाठी २४ तास उपलब्ध राहणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अधिकारी मुख्यालयात अनुपस्थित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींच्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे जंगल परिसरात देखरेख कमकुवत झाली आहे. याच संधीचा फायदा घेत काही ठिकाणी अवैध वृक्षतोड, मुरूम उत्खनन व अतिक्रमणाच्या हालचाली वाढल्याचा आरोप होत आहे. आपत्कालीन घटनांच्या वेळी अधिकारी तात्काळ उपलब्ध नसल्याने प्रतिसाद उशिरा मिळतो, अशीही तक्रार पुढे येत आहे.
शासन नियमांनुसार वन विभागातील फील्डवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नियुक्त कार्यक्षेत्र किंवा मुख्यालयात राहणे बंधनकारक मानले जाते. मात्र या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न आता चर्चेत आला आहे. “जंगल वाचवायचे कोण — कागदावरील यंत्रणा की प्रत्यक्ष उपस्थित अधिकारी?” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
परिसरातील ग्रामस्थांनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी करण्याची तयारी सुरू केली असून, अचानक तपासणी मोहीम राबवावी, उपस्थिती नोंदी तपासाव्यात आणि मुख्यालयात वास्तव्यास नसलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.







