
बीड: /प्रशांत बाफना पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यात उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खुनाचा पुरावा नष्ट करण्यासठी आरोपींनी मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देऊन अपघात किंवा आत्महत्येचा बनाव रचला होता. मात्र, बीड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने तपास करत अवघ्या 48 तासांत या अंधार्या गुन्ह्याचा उलगडा केला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथील सरदारनगर भागातील रहिवासी अफजलखान उर्फ तोहीद कैरातीखान पठाण (वय 36 वर्षे) हा 31 मे 2026 रोजी ‘ मित्रांसोबत बाहेर जातो’ असे सांगून घरातून निघाला होता. मात्र, तो दोन दिवस उलटूनही घरी परतलाच नाही. दरम्यान 1 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास परळी तालुक्यातील लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर अफजलखान याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. सुरुवातीला हा रेल्वे अपघात किंवा आत्महत्या असावी असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने समांत तपास सुरू केला.
घटनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यानंतर पोलिसांना घातपाताचा संशय आला. याचदरम्यान, मयत अफजलखान याच्या नातेवाईकांनी परळी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केले. आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी पोलिसांवर दबाव वाढवला होता. अखेर पोलिसांनी नातेवाईकांना विश्वसात घेऊन ‘ लवकरच आरोपींना अटक करू’ असे अश्वासन दिल्यानंतर आंदेालन मागे घेण्यात आले.
या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदार आणि नातेवाईकांकडून काही संशयास्पद माहिती मिळाली. अफजलखान हा शेवटचा ज्या मित्रांसोबत दिसला होता, त्यांच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लषण करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
3 जून 2026 रोजी गुन्हे शाखेला गोपनिय माहिती मिळाली की, संशयित अरोपी परळी शहरातच आले आहेत. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक सुशांत सुतळे आणि त्यांच्या पथकाने कसलाही विलंब न करता तातडीने सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. ऋषीकेश परमेश्वर फड (वय 27) रा. सामेश्वर नगर परळी आणि गौरव दिपक व्यास (वय 26) रा. स्नेहनगर, परळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आमच्यात पैशांची देवाणघेवाण झाली होती, त्यावरुन वाद झाल्याने आम्ही अफजलखान उर्फ तोहिद याचा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून मृतदेह लेंडेवाडी शिवारात रेल्वे रुळावर फेकून दिला, अशी कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली. गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी परळी ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अवघ्या 48 तासांत या क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचे परळी परिसरात कौतुक होत आहे







