
उपसंपादक : मिलिंद जंजाळे | रावेर-यावल प्रतिनिधी
रावेर-यावल मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि भविष्यात शेतीला बळ देणारा महत्त्वाचा निर्णय घेत, आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना वेगाने राबविण्याचे निश्चित झाले आहे. फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत या योजनेला गती देण्याचे ठोस निर्देश देण्यात आले.
या बैठकीत मतदारसंघातील मध्यम व लघु प्रकल्प, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे तसेच उथळ नाल्यांमध्ये साचलेल्या गाळाच्या उपशाच्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. अनेक वर्षांपासून जलस्त्रोतांमध्ये साचलेला गाळ काढून टाकल्यास पाणीसाठा वाढणार असून भूजल पातळीतही मोठी सुधारणा होणार आहे. यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेष म्हणजे, हा गाळ शेतकऱ्यांना पूर्णपणे विनामूल्य मिळणार असून त्यांनी तो स्वखर्चाने आपल्या शेतात नेऊन जमिनीची सुपीकता वाढवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गाळामुळे जमिनीची पोत सुधारून उत्पादनात वाढ होणार असल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी ‘दुहेरी फायदा’ देणारी ठरणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, फैजपूर तसेच संबंधित विभागाकडे तात्काळ अर्ज सादर करावेत. अर्ज प्राप्त होताच त्वरित परवानगी दिली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे (मो. ९८८१२९००४), तर रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार संजय तायडे (मो. ९८२३९७७५९३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस उपविभागीय अधिकारी, यावल व रावेरचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, सिंचन विभाग, वनविभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी मोठी संधी – गाळ घ्या, शेती समृद्ध करा!






