
(प्रतिनिधी : अमोल खरात)
जामनेर : जामनेर तालुक्यातील सोनारी गावात परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेली काळ भैरव यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. यात्रेनिमित्त गावात पहाटेपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.
काळ भैरव मंदिरात पहाटे अभिषेक, महापूजा, आरती तसेच विविध धार्मिक विधी विधीवत पार पडले. यात्रेदरम्यान भजन-कीर्तन, हरिपाठ व पालखी मिरवणुकीमुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व भाविकांनी दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा लावल्या होत्या.
यात्रेच्या निमित्ताने सोनारी गावात विविध दुकाने, खेळणी, मनोरंजनाची साधने तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यामुळे यात्रेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते व ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.
यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ग्रामपंचायत, स्वयंसेवक व पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेत व उत्साहात पार पडल्याने ग्रामस्थांनी तसेच यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केले.







