
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
करिष्मा नायर, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी यावल पंचायत समितीत घेतलेल्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कामातील ढिलाई, अपूर्ण कामे आणि नागरिकांना होणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “कामात कसूर चालणार नाही” असा कडक इशारा दिला.
या बैठकीस गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, घरकुल आणि आरोग्य विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाकडून सुरू असलेल्या योजनांची माहिती घेताना सीईओ नायर यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत कामकाजात गती आणण्याच्या स्पष्ट सूचना केल्या.
बैठकीनंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, किनगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सध्या अपुरी जागा असल्याने आणि ग्रामीण रुग्णालयातील पी.एम. रूममध्येच प्राथमिक आरोग्य केंद्र चालवावे लागत असल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. तरन्नूम शेख यांच्याशी सविस्तर चर्चा करून सीईओ करिष्मा नायर यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेतली. “रुग्णांना योग्य सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट करत प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव लवकरच योग्य ठिकाणी हलविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या धडक कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, संबंधित विभागांना आता कामात वेग आणावा लागणार आहे. नागरिकांनाही या बैठकीनंतर विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







