
बीड/प्रशांत बाफना
माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील मंदिराच्या प्रवेशद्वारालगत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून गेली तीन दिवसांपाासून गावात तणावाचे वातावरण आहे. दोन्ही बाजूंकडून ठिय्या आंदोलन सुरू आहे. अंजनगावामधील तणावावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अवाहन केले आहे.
राज्यातील धनगर आणि मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की पुतळ्याच्या आढून कोणाचे काही डाव असतील तर ते यशस्वी होऊ देऊ नका. आपण एकत्र बसून शांततेत त्यावर तोडगा काढू असे अवाहन जरांगे पाटील यांनी केले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझी धनगर आणि मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की, तुम्ही शांततेनं घ्या, आपण बसून त्यावर निश्चितपणे तोडगा काढू. पुतळ्याच्या माध्यमातून आपल्याला कोण तोडतंय का? असा कोणाचा डाव आहे का? यावर मराठा आणि धनगर समाजाने लक्ष ठेवले पाहिजे. मग तो भूम, कळंब अथवा अंजनगावचा असो. कुठल्यातरी नेत्याचं ऐकून कोणीतरी काय तरी भडक प्रतिक्रिया देईल आणि तेढ निर्माण करेल. नेत्याला तशी सवयच असते. ते नेहमीच बोंबलत इकडं तिकडं फिरत असतात. त्याला ती सवय असते, त्यामुळे धनगर आणि मराठा बांधवांनो समजून घ्या. दोघांनी शांतता ठेवावी. आपण त्यावर बसून शांततेत तोडगा काढू, असा शब्दही जरांगेंनी दिला.
जरांगे म्हणाले की, मी आज संध्याकाळी अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादाची पूर्ण माहिती घेतो आहे. या प्रकरणावर शांततेत तोडगा निघेल, त्यावर धनगर आणि मराठा बांधवांनी विश्वास ठेवावा. वाद होईल, अशा ठिकाणी आपण शांततेत घेतलं पाहिजे. एखादी बजबजपुरी वळवळ करून पुन्हा माघारी जाईल आणि विनाकरण वादंग निर्माण करेल. त्यामुळे मराठा आणि धनगर बांधवांनी समजून घ्यावं.
पुतळ्याच्या प्रकरणावरून कोणाचे काही डाव आहेत का? असतील तर ते मात्र कोणी यशस्वी होऊ देऊ नका. या प्रकरणामागे कोणाचे तरी डाव असण्याची जास्त शक्यता आहे. पुतळ्याच्या माध्यमातून तेढ निर्माण करायचा, अशी दाट शक्यता असती, त्याचा विचार करा आणि शांत राहावा,त्यावर आपण निश्चितपणे तोडगा काढू, असा शब्द मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही समाजबांधवांना दिला







