
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये उभारण्यात आलेल्या महिला स्वच्छालयासमोर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारामुळे महिलांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. स्वच्छालयाभोवती सडपाणी साचलेले, रस्त्यावर चिखल, तसेच काटेरी झुडपे वाढल्यामुळे महिलांना अक्षरशः जीव मुठीत धरून स्वच्छालयाकडे जावे लागत असल्याचे चित्र सध्या येथे पाहायला मिळत आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती असून दररोज अनेक महिला व मुलींना या स्वच्छालयाचा वापर करावा लागतो. मात्र स्वच्छालयाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे दुर्लक्षित झाल्यामुळे महिलांना चिखल व सडपाण्यातून वाट काढत कसाबसा प्रवेश करावा लागत आहे. काही ठिकाणी काटेरी झुडपे इतकी वाढली आहेत की रात्रीच्या वेळी महिलांना स्वच्छालयाकडे जाणे धोकादायक ठरत असल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे.
या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी व महिलांनी अनेक वेळा सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना तक्रारी करून परिस्थितीची माहिती दिली आहे. मात्र वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
एकीकडे ग्रामपंचायत स्तरावर मुख्यमंत्री ग्राम पुरस्कारासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो, स्वच्छतेचे मोठमोठे दावे केले जातात; मात्र प्रत्यक्षात महिलांसाठी उभारलेल्या स्वच्छालयासमोरच घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याने ग्रामपंचायतीच्या स्वच्छता मोहिमेचा फोलपणा उघड झाला आहे. महिला दिनाच्या दिवशी महिलांचा सन्मान करण्याचे कार्यक्रम केले जातात, पण त्या महिलांना स्वच्छालयापर्यंत जाण्यासाठी नीट रस्ता देखील उपलब्ध करून दिला जात नाही, ही दुर्दैवी बाब असल्याची टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, या परिसरातील घाण तात्काळ साफ करून स्वच्छालयाकडे जाणारा रस्ता दुरुस्त करावा, सडपाण्याचा निचरा करावा तसेच काटेरी झुडपे काढून महिलांना सुरक्षित व स्वच्छ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.







