
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी गावातील आंबेडकर नगर अंगणवाडी परिसरात सध्या घाणीचे अक्षरशः साम्राज्य पसरलेले असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. परिसरातील अनेक ठिकाणी गटारी तुटलेल्या, सांडपाणी रस्त्यावर वाहत असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसह लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, आंबेडकर नगर भागात गटारींची दुरवस्था इतकी वाढली आहे की अनेक ठिकाणी गटारी कोसळल्या असून त्यांचे अक्षरशः “तीन तेरा” झालेले आहेत. सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हा परिसर अंगणवाडीचा असल्याने लहान मुलांना दररोज या घाणीमधून जावे लागत आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब ठरत आहे.
दरम्यान, साकळी ग्रामपंचायत मुख्यमंत्री योजनांमध्ये सहभागी असल्याचा मोठा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात विकासकामे फक्त कागदावरच होत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गावात विकासाच्या नावाखाली कामे सुरू असल्याचे दाखवले जात असले, तरी आंबेडकर नगरसारख्या दलित वस्तीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
विशेष म्हणजे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अशा भागांमध्ये मूलभूत सुविधा उभारणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात गटारीच मोडकळीस आलेल्या दिसत आहेत. जर ही योजना प्रामाणिकपणे राबवली गेली असती तर आंबेडकर नगरमधील नागरिकांना अशा अस्वच्छ परिस्थितीत राहावे लागले नसते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
सध्या परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ गटारी दुरुस्ती, स्वच्छता मोहीम आणि सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देखील दिला जात आहे.
एकीकडे शासन स्वच्छता आणि विकासाचे मोठे दावे करत असताना साकळीतील आंबेडकर नगर परिसरातील ही भीषण वास्तव परिस्थिती ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आता तरी संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.






