
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल–बऱ्हाणपूर रस्त्यावर नावरे फाट्याजवळ बस थांब्याजवळ टाकण्यात आलेला गतिरोधक आता अक्षरशः नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. योग्य मोजमाप, रंगरंगोटी किंवा कोणतेही सूचना फलक न लावता उभारण्यात आलेल्या या गतिरोधकामुळे रोजच छोटे-मोठे अपघात होत असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या गतिरोधकाची उंची आणि रचना पूर्णपणे चुकीची असल्याने दुचाकीस्वारांना अचानक ब्रेक लावावे लागतात. अनेक वेळा वाहनचालकांना तो वेळेवर दिसतही नाही. परिणामी दुचाकी घसरून पडणे, वाहनांचे नियंत्रण सुटणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी हा गतिरोधक अधिक धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांत या ठिकाणी अनेक दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून काही जणांना गंभीर दुखापती झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र इतक्या घटनांनंतरही संबंधित विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिकांनी सांगितले की, बस थांब्याजवळ गतिरोधक असणे आवश्यक असले तरी तो नियमांनुसार असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र येथे टाकलेला गतिरोधक कोणत्याही निकषांवर बसत नसून तो अक्षरशः ‘जिवघेणा सापळा’ ठरत आहे.
नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याने प्रश्न निर्माण झाला आहे की, एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहेत का?
तातडीने उपाययोजनांची मागणी
या धोकादायक गतिरोधकाची उंची कमी करणे, त्यावर पांढरे-पिवळे रंग देणे, रिफ्लेक्टर व सूचना फलक लावणे अशी तातडीची उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा एखादा निष्पाप नागरिक जीव गमावल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
“अपघात झाल्यावरच कारवाई का?”
रोजच्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून प्रशासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात येत आहे.






