
बीड/प्रशांत बाफना
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे. हत्या प्रकरणातील एक आरोपी १४ महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार आहे. न्यायालयाने या आरोपीला तशी परवानगी दिली आहे. आरोपी जयराम चाटे तब्बल १४ महिन्यांनंतर काही तासांसाठी कारागृहातून बाहेर येणार आहे. दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना आक्षेप घेतलाय.
जयराम चाटे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी आहे. हत्याकांडात त्याही सहभाग होता. जयराम चाटे काही तासांसाठी कारागृहातून बाहेर येणार आहे. त्याच्या धाकट्या भावाच्या निधनानंतर होणाऱ्या विधीस उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात परवानगी दिली आहे. जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे २ मार्च रोजी निधन झाले. बाराव्याच्या विधीस उपस्थित राहण्यासाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात विशेष परवानगी मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला परवानगी दिली.
न्यायालयाने घातल्या अटी
जयराम चाटे याला परवानगी देताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. जयराम चाटे याला पोलीस बंदोबस्तमध्ये नेले जाणार आहे. त्यानंतर काही तासात त्याला पुन्हा तुरूंगात आणले जाईल. आरोपीच्या वकिलांनी सर्व अटींचे पालन करण्याची तसेच पोलीस बंदोबस्ताचा खर्च भरण्याची तयारी दर्शवली आहे. आरोपीवर गंभीर गुन्हे असल्याने त्याला बाहेर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता. परंतु, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर एक दिवसाची मर्यादित परवानगी जयराम चाटेला देण्यात आली आहे.
जयराम चाटेच्या वकिलांकडून न्यायालयात अर्ज दाखल झाल्यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. विधीच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी कोण घेणार? सव्वा वर्षापासून महाराष्ट्र बघतोय की हे आरोपी किती खालच्या पातळीचे आहेत. जर यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला होता







