
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील किनगाव येथे शासनाने लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेले नवीन ग्रामीण रुग्णालय सध्या पूर्णपणे बंद अवस्थेत असून येथील भोंगळ कारभारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रुग्णालयात ना वीज व्यवस्था आहे, ना पाण्याची सुविधा, तसेच एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रत्यक्षात उपयोगातच येत नाही. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे हे रुग्णालय बंद असतानाही तब्बल ९ कर्मचाऱ्यांचे पगार नियमितपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
किनगाव व परिसरातील हजारो नागरिकांना तातडीची आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने शासनाने नवीन ग्रामीण रुग्णालय उभारले. परंतु प्रत्यक्षात येथे मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालयाचे दरवाजे कायम बंदच दिसतात. त्यामुळे आजारी नागरिकांना उपचारासाठी यावल किंवा इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत असून गरीब रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.
विशेष म्हणजे रुग्णालयात कर्मचारी पदस्थ असतानाही रुग्णालय सुरू नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णालय बंद असताना ९ कर्मचाऱ्यांचे पगार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
यापेक्षा गंभीर बाब म्हणजे या सर्व प्रकाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित आरोग्य प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारलेले रुग्णालय बंद पडले असताना कोणतीही ठोस कारवाई किंवा उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला असून तत्काळ वीज व पाण्याची व्यवस्था करून डॉक्टर व संपूर्ण कर्मचारी उपस्थित करून रुग्णालय सुरू करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा हा प्रकार आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे ज्वलंत उदाहरण ठरत असून आता तरी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







