
बाळासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर द्यावे; मोदींनी राजीनामा द्यावा अशीही मागणी
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
भाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी औरंगाबाद येथे जोरदार आंदोलन करत अमर साबळे यांचे फोटो जाळून संताप व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च रोजी मुंबई येथे “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या नावाने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत केलेल्या कथित करारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच Jeffrey Epstein प्रकरणात नाव समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या परराष्ट्र धोरणावर अमेरिकेचा दबाव आहे का, असा सवालही करण्यात आला होता.
याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अमर साबळे यांनी केलेल्या वक्तव्याला वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेतला. “नेत्यांना प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा अधिकार आहे. मात्र त्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी भाजपचे नेते बेताल वक्तव्य करत आहेत,” असा आरोप आंदोलकांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर स्पष्टीकरण द्यावे आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या छायाचित्राला आग लावून संताप व्यक्त करण्यात आला. घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य तथा नगरसेवक अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे, युवा आघाडी मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव, युवा आघाडी पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे, नगरसेविका करुणा मेघानंद जाधव, महिला आघाडी अध्यक्ष साधना पठारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे, पश्चिम शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलनामुळे औरंगाबाद शहरात राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले असून आगामी काळात या प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






