
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
रावेर–यावल : राज्यभर भोंदू बाबांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात असतानाच, भोंदू बाबा अशोक खरात यांचे रावेर आणि यावल तालुक्यात काही कनेक्शन असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे ही चर्चा केवळ सर्वसामान्य नागरिकांमध्येच नव्हे, तर काही अधिकाऱ्यांमध्येही दबक्या आवाजात सुरू असल्याने या प्रकरणाला अधिकच गांभीर्य प्राप्त झाले आहे.
मिळालेल्या अनौपचारिक माहितीनुसार, अशोक खरात याने अंधश्रद्धेचा आधार घेत विविध ठिकाणी आपला प्रभाव निर्माण केल्याचे बोलले जाते. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रम, पूजापाठ, तसेच तथाकथित “चमत्कार” दाखवून लोकांचा विश्वास संपादन केल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. त्यामुळे रावेर–यावल तालुक्यात त्याचे काही संपर्क जाळे होते का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “काही व्यक्तींमार्फत या भोंदू बाबाचे संबंध स्थानिक पातळीवर राजकारणी, उच्चभ्रू व्यावसायिक, नाशिक, नगर, जळगाव मधील उच्च पदस्थ अधिकारी यांचेशी जोडले गेले असावेत,” अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही, हेही तितकेच खरे आहे.
या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. “जर खरंच असे कनेक्शन असेल, तर ते उघडकीस आणणे गरजेचे असून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
पोलीस प्रशासनही या चर्चेकडे लक्ष ठेवून असून, कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावे समोर आल्यास कारवाई केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, संशयास्पद हालचालींबाबत त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकूणच, भोंदूगिरीविरोधातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर रावेर–यावल तालुक्यात सुरू असलेल्या या चर्चेमुळे वातावरण तापले असून, सत्य काय याचा उलगडा होणे आता गरजेचे बनले आहे.






