
यावल प्रतिनिधी:- राहुल जयकर
यावल पूर्व वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीच्या प्रकारांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पूर्व यांना निवेदन देत अवैध वृक्षतोड तात्काळ थांबवावी व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच या प्रकारांना चालना मिळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय, यावल पूर्व समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे परवानगीही मागण्यात आली आहे.
वेळेत ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला असून, त्यामुळे परिसरातील वातावरण तापले आहे. प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






