
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असून ग्रामपंचायतीच्या बॅनरमुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिराच्या निमित्ताने ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात आलेल्या स्वागत बॅनरमध्ये ग्रामपंचायतीच्या महिला उपसरपंच तसेच एका आदिवासी महिला सदस्याचा फोटोच गायब असल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दिनांक १४ मार्च रोजी साकळी येथील भवानी माता मंगलकार्यालया समोर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मोठे स्वागत बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर सरपंच व काही सदस्यांचे फोटो ठळकपणे झळकत असताना महिला उपसरपंच आणि एक आदिवासी महिला ग्रामपंचायत सदस्य यांचा फोटो मात्र पूर्णपणे गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा केवळ “चुकून झालेला प्रकार” की जाणीवपूर्वक केलेली राजकीय डावपेचबाजी, असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच महिला दिनानिमित्त साकळी येथे मोठ्या थाटामाटात कार्यक्रम आयोजित करून महिलांच्या हाती एक दिवसासाठी ग्रामपंचायतीचा कारभार देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला होता. परंतु त्या कार्यक्रमानंतर अवघ्या काही दिवसांतच ग्रामपंचायतीच्या अधिकृत बॅनरमधून लोकनियुक्त महिला उपसरपंच आणि आदिवासी महिला सदस्य यांना डावलण्यात आल्याने हा सन्मान फक्त दिखाव्यासाठी होता का? असा सवाल आता गावभर चर्चेत आहे.
यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही दोन्ही महिला प्रतिनिधी सरपंचांच्या पॅनलमधूनच निवडून आलेल्या असल्याची माहिती समोर येत आहे. तरीही बॅनरमध्ये त्यांचा फोटो न घेण्यामागे नेमका कोणाचा आदेश होता? बॅनर तयार करताना त्यांना मुद्दाम वगळण्यात आले का? की ग्रामपंचायतीतील अंतर्गत राजकीय वादाचे हेच खरे रूप आहे? अशी चर्चा गावात जोर धरू लागली आहे.
शासनाच्या महत्वाच्या उपक्रमात स्थानिक राजकारणाचा शिरकाव होत असल्याची तीव्र टीका ग्रामस्थांकडून केली जात आहे. महिला सन्मानाच्या गप्पा मारणारेच महिला प्रतिनिधींना बॅनरमधून गायब करतात, ही मोठी शोकांतिका आहे, असेही काही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बॅनर तयार करताना जबाबदार असलेल्या व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करावी तसेच सरपंच आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
या घटनेमुळे सध्या साकळी गावातील राजकीय वातावरण चांगलेच तपाण्याची शकता असून महिला प्रतिनिधींचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे. पुढील ग्रामसभा किंवा बैठकीत या मुद्द्यावर मोठा गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
साकळी ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या या नव्या वादामुळे महिला सन्मानाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष कृती यामधील दरी पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा गावभर रंगू लागली आहे.






