
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी तातडीची सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.
या अनुषंगाने रामल्ला (पॅलेस्टाईन), दोहा (कतार), रियाध (सौदी अरेबिया), तेल अवीव (इस्रायल), तेहरान (इराण), बगदाद (इराक), कुवैत, बाहरीन, मस्कत (ओमान), जॉर्डन आणि अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधा
संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी २४x७ हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या सूचना जारी करत आहेत.
महाराष्ट्र शासनाचीही नागरिकांना सूचना
महाराष्ट्र शासनच्या वतीने परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि गरज भासल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासन केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
** महत्त्वाचे संदेश**
अनावश्यक प्रवास व गर्दीची ठिकाणे टाळा
स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा
भारतीय दूतावासांच्या अधिकृत सोशल मीडिया व वेबसाइट्स तपासत राहा
कुटुंबीयांशी संपर्क कायम ठेवा
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचाच मार्ग सुरक्षित असल्याचा इशारा देत प्रशासनाने सर्व भारतीय नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे.






