
मगरूळ ता. प्रतिनिधी —
आश्रम शाळा मगरूळ या ठिकाणी पाहणीसाठी गेलेल्या पथकाला शाळेमध्ये एकही विद्यार्थी उपस्थित आढळून आला नाही. शाळेतील कर्मचारी वर्गाकडे विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवा-उडवीची उत्तरे दिली.कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही आमच्या मनाने सुट्ट्या जाहीर केल्या असून विद्यार्थ्यांना सुटी दिली आहे”, मात्र या संदर्भात कोणताही लेखी आदेश, परवानगी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश दाखविण्यात आले नाहीत. विशेष बाब म्हणजे, शाळेत कामाठी व स्वयंपाकी उपस्थित होते, मात्र एकही शिक्षक, सर किंवा मुख्याध्यापक उपस्थित नव्हते.ही बाब अत्यंत गंभीर असून, आश्रम शाळेतील आदिवासी व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी थेट खेळ केला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. शासकीय नियमांना धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होऊ नये यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी होत आहे.







