गेले दशकभर “देवेंद्र फडणवीस” हे नाव राज्याच्या सत्तापटलावर या ना त्या कारणांमुळे गाजत आहे.
निष्कलंक, चारित्र्यसंपन्न आणि आपल्या कामाप्रति प्रामाणिक असणारा हा लोकनेता गेली दशक पूर्णपणे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा एकमेव केंद्रबिंदू ठरत आहे..
नागपूर शहरात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी आपले शीर्षस्थ नेते नितीनजी गडकरी यांच्या खांद्याला खांदा लावून घेतलेले परिश्रम देवेंद्रजी फडणवीस यांना महापौर पदाच्या रुपात फळाला आले. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ते राज्यात सर्वात तरुण महापौर म्हणून पुढे नावारुपाला आले.
देवेंद्रजी फडणवीस हे एक लोकप्रिय नेते आहेत. नगरसेवक, महापौर, आमदार ते मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते हा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असा राहिलेला आहे.
एक धुरंदर नेता म्हणून त्यांचे मला सर्वांत जास्त आवडणारे गुण म्हणजे हजरजबाबीपणा, जबरदस्त वक्तृत्व, एखादा विषय मांडण्याची हातोटी, राज्यभर अफाट दौरे, प्रचंड जनसंपर्क आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे स्व पक्षात असो किंवा विरोधकांच्या गोटात, पुढच्या क्षणाला काय होणार आहे ह्याचा त्यांना बहुतांश वेळा येणारा अचूक असा अंदाज…. प्रत्येक क्षणी विरोधकांच्या डावाला प्रतिडाव टाकण्याची असणारी त्यांची चाणाक्ष बुद्धी..
देवेंद्रजी फडणवीस यांची अफाट आणि अचाट कार्यक्षमता भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्याही नजरेत भरली आणि पुढे ते महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेशाध्यक्ष झाले. अर्थात त्यावेळी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी आणि विरोधकांना एक सक्षम पर्याय म्हणून एक अभ्यासू, आक्रमक वक्तृत्व असलेले शालीन नेतृत्व यादृष्टीने भाजप पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतलेला होता. पक्षश्रेष्ठींचा निर्णय सार्थ ठरवत देवेंद्रजींनी २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात पक्ष प्रतिमेला साजेसा पण अतिशय आक्रमक पवित्रा घेतला होता. एकीकडे २५ वर्षे जुनी युती तोडून शिवसेना विरोधी पक्ष म्हणून समोर उभी ठाकली असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीला भुईसपाट करत सेनेला त्यांनी केलेली चूक दाखवत महाराष्ट्रात पक्षाला ‘न भूतो न भविष्यति’ असे यश मिळवून दिले.
राजकीय विश्लेषक भलेही त्यावेळच्या ‘मोदी लाटे’चा उल्लेख करतील पण ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ हे समीकरण जनतेला त्यावेळी मनस्वी पटलेले होते. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे १०० च्या वर आमदार निवडून आले. तोच पराक्रम त्यांनी २०१९ विधानसभेला दाखवून पुन्हा एकदा राज्यात भाजपाची शंभरी पार केली. २०२४ ला पण ….
५ वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्यशकट हाकताना देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सम्राटाच्या भूमिकेत न राहाता ‘चाणक्या’च्या बुद्धी चातुर्याने कारभार केला. विरोधी पक्षांनी सातत्याने मार्गात उभे केलेले अडथळे, पक्षांतर्गत छुपे विरोध, मित्र पक्षाने चालवलेली अडवणूक, समोर शरद पवार यांच्यासारखा बलाढ्य विरोधक या साऱ्या प्रतिकूलतेवर मात करत देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत मुत्सद्दी आणि धोरणीपणे राज्य प्रगतीपथावर नेहण्यासाठी कोणत्याही प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी न करता दीर्घकालिन उत्तर शोधण्यावर परिश्रम घेतले.
आज राज्यात विविध पक्षांमध्ये अनेक महारथी, धुरंधर नेते सक्रिय आहेत आणि त्या सगळ्यांना आपले मुख्य विरोधक हे फक्त देवेंद्र फडणवीस हेच वाटतात हे एक प्रकारे त्यांचे यशच आहे .
२०१९ ला बहुमताचे जवळ असताना शिवसेनेच्या सत्ता लालशी भूमिकेने सत्ता मिळाली नाही. मात्र अडीच वर्षात ठाकरेंना धोबीपच्छाड देते एकनाथ शिंदे ना मुख्यमंत्री केले. तेच नाही तर शरद पवार यांच्यावर मात करत राष्ट्रवादीत उभी फुट पाडली. अजित पवार यांना सोबत घेऊन राज्याच्या राजकारणात किंगमेकर झाले. २०२४ ला दोन तृतीयांश बहुमताचे सरकार आणून मुख्यमंत्री झाले.
साथ पक्षाची आहे पण कष्ट हे देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वतःचे आहेत.. त्यातही त्यांना घराघरात पोहोचवायच्या कामात मात्र विरोधकांच्या विविध सोशल मीडिया टिमनी राबून अधिकचा हातभार लावलेला आहे.. त्यासाठी त्या सर्व विरोधी पक्षांचे आभार..!!
विरोधक काय करतील..??
देवेंद्र फडणवीस यांना ते ब्राम्हण आहेत म्हणून हिनवतील, ते एका रुपयांचा भ्रष्टाचार करू शकले नाहीत, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे कधीही कुठेही सापडत नाहीत म्हणून चिडतील, त्यांनी आपल्या सुविद्य पत्नीला बळजबरीने घरी बसवून ठेवले नाही म्हणून त्यांना नावे ठेवतील..
काय, करतील काय विरोधक मित्र..?? देवेंद्र फडणवीस यांच्या शरीर यष्टीवर बोलतील? विविध नावांनी त्यांची हेटाळणी करतील? स्वतःला प्रसिद्धी मिळावी म्हणून कारण नसताना त्यांच्या पत्नीला टीकेचे लक्ष्य करतील ??
पण एक मुरलेला राजकीय नेता कधीही अशा प्रकारच्या टिकेला कुठलीही भीक न घालता असल्या तमाशाकडे ढुंकून ही बघत नाही. मग ते नरेंद्रजी मोदी असोत की देवेंद्रजी फडणवीस असोत..
पण विरोधकांच्या अशा कपटी, द्वेषी आणि विकृत टीकांना मात्र देवेंद्रजी फडणवीस हे अजिबात विचलित न होता, सर्वसामान्य जनतेत नेहमीप्रमाणे जाऊन केल्या गेलेल्या सर्व टिका टिपन्नी सकारात्मकतेमध्ये बदलवुन उत्तर देतात.
महाराष्ट्रासारख्या थोर परंपरा आणि भौगोलिक विविधता असलेल्या, प्रशासकीय दृष्ट्या कारभार करण्याबाबत अवघड अशा राज्याचे नेतृत्व करणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हे.. आणि म्हणूनच वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी ही अवघड जबाबदारी अगदी लीलया पेलत महाराष्ट्र राज्याच्या आजवरच्या महनीय मुख्यमंत्र्यांच्या मांदियाळीत आपले अनोखे वेगळेपण अधोरेखित करायला लावणारे देवेंद्रजी हे ‘#एकमेवाद्वितीय’च ठरतात.
ज्या प्रमाणे कोंबडे झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही त्याच प्रमाणे सर्व विरोधकांच्या छाताडावर पाय देऊन देवेंद्रजी फडणवीस संपूर्ण बहुमताने मुख्यमंत्री झाले…
शेवटी एवढेच सांगेन की, राजकारण म्हणजे करिअर समजून काम करणाऱ्यांसाठी देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वगुण हे ‘#दीपस्तंभ’ आहेत.
महाराष्ट्राच्या अशा या लाडक्या लोकनेत्याला माझ्याकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. !
उदंड निरोगी आयुष्य देवो आणि येणाऱ्या प्रत्येक दिवशी यशाची नवनवी शिखर गाठण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना..!!
भूषवलेले पदे
१९८९ भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष
१९९९ ते आजतागायत – विधानसभा सदस्य
१९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर
१९९४ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
२००१ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
२०१० भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणी्स
२०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष
२०१४ ते २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
२०१९ ला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री
२०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते
जून २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
५ डिसेंबर २०२४ पासुन तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
कोट
माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी देवेंद्रने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि नंतर महाराष्ट्राचा तीन वेळा मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता उपमुख्यमंत्री असे पद भूषवणारा देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊ होय.