
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य विभागावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजाविरोधात विविध स्तरावर तक्रारींचा अक्षरशः भडिमार होत असून, प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे तसेच जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासन विभागाकडे वेळोवेळी लेखी तक्रारी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या तक्रारींवर नेमकी चौकशी झाली का, जबाबदारी निश्चित झाली का आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली.
याबाबत प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही.
आरोग्य विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित आणि अत्यंत संवेदनशील विभाग मानला जातो. अशा महत्त्वाच्या विभागाच्या प्रमुखांविरोधात सातत्याने तक्रारी येत असताना प्रशासन शांत का आहे, असा सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे. काही तक्रारींमध्ये मनमानी कारभार, प्रशासकीय विसंगती, तसेच नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांमधील अडथळे यांचा गंभीर उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनांमध्ये स्वतंत्र चौकशी समिती नेमून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न असल्याचा संशय अधिक बळावेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
दरम्यान, तक्रारी असूनही प्रशासनाकडून अधिकृत माहिती जाहीर होत नसल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. “तक्रारी दाखल होतात, पण कार्यवाही का होत नाही?” हा नागरिकांचा संतप्त प्रश्न आता प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांनी पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवावा आणि गैरव्यवहार आढळल्यास कठोर निर्णय घ्यावेत, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.
आता नजर प्रशासनाच्या भूमिकेकडे
या सर्व तक्रारींची सखोल चौकशी करून अहवाल जाहीर केला जाणार का? अनेक गैरव्यवहारांबाबत सत्य समोर येणार का? की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार? — या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात स्पष्ट होणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागले आहे.







