
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल पंचायत समिती अंतर्गत बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व काळा बाजार झाल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. विशेष म्हणजे ज्या अभियंत्यावर या कथित गैरव्यवहाराचे आरोप आहेत, तोच अभियंता सध्या वरिष्ठ अभियंता म्हणून काम पाहत असल्याने चौकशीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये असा आरोप केला जात आहे की, मागील कालावधीत बांधकाम कामांमध्ये बॅकडेट कार्यारंभ आदेश, तांत्रिक मान्यता व अपूर्ण कामे दाखवून निधी काढल्याचे प्रकार घडले. त्यामुळे शासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याच नियंत्रणाखाली चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने चौकशी निष्पक्ष होणार का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे संपूर्ण प्रकरणाची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद जळगाव यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित अभियंत्याची चौकशी स्थानिक स्तरावर न ठेवता बाहेरील आयुक्तस्तरीय स्वतंत्र पथकाद्वारे करावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. बाहेरील टीममार्फत चौकशी झाल्यास सत्य समोर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, जर खरोखरच गैरव्यवहार झाला असेल तर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचा पैसा वसूल करावा. अन्यथा हा प्रकार प्रशासनावरील विश्वास डळमळीत करणारा ठरेल.
आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लागले असून, बाहेरील आयुक्तस्तरीय चौकशी पथक नेमले जाते का आणि कथित काळा बाजाराचा पर्दाफाश होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






