
तालुका प्रतिनिधी: राहुल जयकर
सांगवी बुद्रुक गावात Reliance Jio चे नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून अचानक मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे गावातील दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत.
नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाइन बँकिंग व्यवहार, यूपीआय पेमेंट, शासकीय संकेतस्थळांवरील कामे, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण तसेच व्यापाऱ्यांचे डिजिटल व्यवहार ठप्प झाले आहेत. किरकोळ दुकानदारांपासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी मोबाईलला सिग्नलच नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणेही कठीण होत आहे.
ग्रामीण भागात पर्यायी नेटवर्क सेवा मर्यादित असल्यामुळे जिओ सेवा बंद पडल्याचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत आहे. शेतकरी वर्गालाही पीकविमा, बँकिंग व शासकीय योजना संदर्भातील ऑनलाइन कामे करता येत नसल्याने नाराजी वाढत आहे.
गावातील नागरिकांनी संबंधित कंपनीने तात्काळ दखल घेऊन नेटवर्क सेवा पूर्ववत करावी व वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.







