
तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर
ज्योती विद्या मंदिर, सांगवी बुद्रुक येथे सन २०२४ ते २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीत एनसीसी ग्रुप सांगवी बुद्रुक अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रसैनिकांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. भंगाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट डॉ. दीपक पाटील (पी.ओ., नाहटा महाविद्यालय, भुसावळ) तसेच आय.सी.टी.सी. समुपदेशक श्री. वसंत संदानशिव यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात एनसीसीचे महत्त्व विशद करताना सांगितले की, एनसीसीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच संरक्षण सेवेमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात. अकरावी–बारावीच्या काळात एनडीएची तयारी केल्यास अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. एनसीसीमुळे केवळ वैयक्तिक जीवनात शिस्त निर्माण होत नाही, तर सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुणही विकसित होतात, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा नियंत्रण पथक, जळगाव, रेड रिबन क्लब व ग्रामीण रुग्णालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार वितरण समुपदेशक श्री. वसंत संदानशिव यांच्या शुभहस्ते पार पडले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. भंगाळे सर यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थी दशेपासून नियमित अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. अभ्यासाचे योग्य नियोजन करून दररोज किमान दोन ते तीन तास वाचन व लेखन केल्यास परीक्षेच्या काळात तणाव जाणवत नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी छात्रसैनिक हिमेक्षा कोळी, प्रज्ञा बनसोडे, हिमांशू येवले व मिलिंद धनगर यांनी मनोगत व्यक्त करत एनसीसीतील आपल्या अनुभवांचे कथन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी अधिकारी श्री. पी. एम. भंगाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व एनसीसी कॅडेट्स यांनी विशेष परिश्रम घेतले.







