
मुंबई: /प्रशांत बाफना मुंबईचा महापौर कोण असावा यात काहीच शंका नाही. तो मराठीच असेल आणि हिंदूच असेल! ” अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीचे धोरण स्पष्ट केले. फडणवीस यांनी हिंदुत्व, मराठी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आजतकच्या एका वाहिणीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
बीएमसीच्या महापौरपदी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “ चेन्नईत जसा तमिळ महापौर होतो, तसा मुंबईत मराठी महापौरच होणार. ज्यांच्या अंगात छत्रपती शिवरायांचे रक्त आहे आणि जे त्यांच्या विचारांवर चालतात, ते सर्व मराठी आहेत. तसेच बाहेरून आले म्हणून काय झाले, जे इथे स्थायिक झाले आहेत ते सर्व मुंबईकर आहेत, मग त्यांची भाषा हिंदी असो. आपण सर्व हिंदू म्हणून एक आहोत आणि हिंदुत्व हाच आमचा आत्मा आहे.
दरम्यान, अवैध घुसखोरांच्या मुद्यावर मुख्यमंत्री आक्रमक झाले. “ आम्ही केवळ बोलत नाही, तर कृती करतो. बांगलादेशी घुसखोरांना डिपोर्ट (देशातून बाहेर काढणे) करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येणार्या काळात एकाही बांगलादेशी घुसखोराला मुंबईत राहू देणार नाही, त्यांना वेचून बाहेर काढू असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईच्या विकासाबद्दल बोलताना फडणवीसांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, आम्ही घरांची डिलिव्हरी सुरू केली असून नवीन डेव्हलपर्सना संधी दिली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, येत्या 7 ते 8 वर्षांत मुंबई पूर्णपणे स्लम फ्री (झोपडपट्टीमुक्त) होईल. पाणी तुंबण्याची समस्या सोडवण्यासाठी 100 टक्के पंपिंग स्टेशनमध्ये काम युद्धपातळीवर सुरू असल्याचंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर निशाणा: “ उद्धव ठाकरेंनी मेट्रो प्रकल्पात योगदान देण्यास नकार दिला होता, तेव्हा आम्ही एमएमआरडीएच्या माध्यमातून कामे पूर्ण केली. एमएमआरडीएने बीएमसीच्या कोणत्याही अधिकारावर गदा आणलेली नाही, उलट मुंबई इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत केले आहे. या व्यतिरिक्त एमएमआरढीएने कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. असे म्हणत बीएमसी संपवण्याचे आरोपही त्यांनी फेटाळून लावले.







