
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल येथील पाटबंधारे विभागातील अधिकारी अभियंता रोटे हे नेहमीच कार्यालयातून गायब राहत असल्याची जोरदार चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. शासकीय कार्यालयात जनतेची कामे वेळेत व्हावीत, समस्या तात्काळ मार्गी लागाव्यात यासाठी अधिकारी उपस्थित असणे अपेक्षित असताना, संबंधित अभियंता यांची खुर्ची मात्र अनेकदा रिकामीच दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या शेतकरी, नागरिक व ग्रामस्थांना “साहेब साईटवर गेले”, “मिटिंगला गेले” अशीच ठरलेली उत्तरे कर्मचारी वर्गाकडून दिली जात असल्याचे समोर येत आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक पाट, बंधारे व कालव्यांमध्ये साफसफाई नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी गाळ साचलेला असून पाण्याचा प्रवाह अडथळ्यात आला आहे.
पावसाळा तोंडावर असताना देखील पाटबंधारे विभागाकडून कोणतीही प्रभावी कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनत असताना अधिकारी मात्र कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, विभागातील अनेक कामे रखडलेली असताना अभियंता रोटे यांचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. “कार्यालयात अधिकारीच नसतील तर जनतेने न्याय मागायचा कुणाकडे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
यावल तालुक्यातील अनेक शेतकरी व नागरिकांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पाटबंधारे विभागातील कारभाराची चौकशी करावी तसेच कायम गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.






