
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यात सुरू असलेल्या रस्ते व बांधकाम कामांबाबत मोठा गोंधळ उडाला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या कामांच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखो-कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही प्रत्यक्षात कामे निकृष्ट होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये दोन्ही विभागांतर्गत करण्यात आलेली रस्त्यांची कामे अल्पावधीतच उखडू लागली आहेत. ठिकठिकाणी खड्डे, निघालेला डांबर थर, बाजूला बसलेले रस्ते – हे चित्र सर्वत्र दिसत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने “हे काम झाले की फक्त कागदावर?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, मापदंड न पाळणे आणि तांत्रिक तपासणी न करणे हे प्रकार सर्रास सुरू आहेत. “काम सुरू असताना अनेक वेळा सूचना दिल्या, पण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले,” असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणात ठेकेदार आणि संबंधित विभागातील काही अधिकारी यांच्यात संगनमत असल्याचा गंभीर आरोपही होत आहे. दर्जा तपासणी न करता बिले मंजूर केली जात असल्याने भ्रष्टाचाराचा संशय अधिक बळावला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग दोन्ही ठिकाणी एकाच पद्धतीने निकृष्ट कामे होत असल्याने संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. “करदात्यांचा पैसा वाया घालवणाऱ्यांना सोडले जाणार नाही. दोषींवर तात्काळ कडक कारवाई झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांना काळ्या यादीत टाकावे, तसेच निकृष्ट दर्जाची सर्व कामे पुन्हा करून घ्यावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावल तालुक्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा ‘निकृष्ट कामांचा खेळ’ आता उघडकीस आला असून, प्रशासन यावर कठोर पावले उचलणार का, की पुन्हा एकदा डोळेझाक करणार? हा मोठा सवाल नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.







