
नाशिक: /प्रशांत बाफना संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सुनावणी आज नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली. सुनावणीच्या सुरुवातीलाच न्यायालयाच्या कक्षात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. अशोक खरातला न्यायाधीशांसमोर हजर करताच, न्यामूर्तींनी त्याला प्रश्न विचारला. “ तुमची काही तक्रार आहे का? ” या प्रश्नावर खरातने केवळ एका शब्दात “ नाही” असे उत्तर दिले. या उत्तराने सुनावणीची सुरूवात झाली असली, तरी त्यानंतर सरकारी वकिलांनी न्यायालयांत मांडलेले मुद्दे अत्यंत खळबळजनक होते.
सरकारी पक्षाचा युक्तीवाद करताना सांगण्यात आले की, अशोक खरात हा या संपूर्ण गुन्ह्याचा ‘ मास्टरमाईंड’ आहे. तपासी अधकिरी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयाला माहिती दिली की, आरोपी तपासात सहाकार्य करत नसून त्याच्या मोबाईलमधील अनेक गोष्टी कोडवर्डमध्ये आहेत. या कोडवर्डचा उलगडा करण्यासाठी आणि त्याला समोर बसवून चौकशी करण्यासाठी 3 दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे. सरकारी वकिलांनी असाही आरोप केला की, खरात महिलांना काही विशिष्ट पाणी किंवा द्रव्य देत होता,त्यामागील सत्य शोधने गरजेचे आहे.
तपासादरम्यान आणखी एक महत्वाची बाब समोर आली ती म्हणजे राजकीय कनेक्शन, खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर केला जात असून, त्याने काही राजकीय व्यक्तींची नावे ‘ डमी’ स्वरुपात सेव्ह केल्याचा संशय पोलिसांना आहे. दुसरीकडे, अशोक खरातच्या वकिलांनी वाढीलव कोठडीला विरोध केला, परंतु पीडित महिलांच्या वतीने बाजू मांडणार्या वकिलांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जास्तीत जास्त कोठडीची मागणी केली.
दोन्ही बाजूंचा प्रदिर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आत 1 एप्रिल पर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणात पोलिस तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला समोर येत असल्याने, या वाढीव कोठडीत अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.







