
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना –तहसील कार्यालयात ओळख असल्याचे सांगून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या राहुरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. बाबासाहेब किशोर राऊत (वय ४०, रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदाराचे शासकीय ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य’ योजनेअंतर्गत ३० हजार मंजूर करून देण्यासाठी राऊत याने १ हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राऊत याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी केले आहे.
नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “सामान्य माणसाची अशी अवस्था असेल तर प्रशासन झोपेत आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शासकीय कामांसाठी लाच मागितली जात असल्याच्या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून, संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे






